नगर – नगर शहरातील वाढत्या गुंडगिरीचा बंदोबस्त करा, पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा त्यांच्या यंत्रणेवर धाक राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढली असून शहरात जागा ताब्यात घेण्याचे प्रमाण वाढल्याने या त्रासला कंटाळून अनेकजण स्थलांतरित होत असल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ल्यात खून झाला. आमदार जगताप यांनी चत्तर कुटुंबीयांसह जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. त्यानंतर आ.जगताप पत्रकारंशी बोलत होते. यावेळी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत खोसे उपस्थित होते. चत्तर हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी आ. जगताप यांनी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली केल्याने गुंडगीरीचा विषय आटोक्यात राहणार नाहीतर पोलिसांनी कामात बदल करायला हवा. यापूर्वी जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का व इतर स्वरूपाची कारवाई करण्यात आली. अशीच कारवाई नगर शहरातील टोळ्यांवर करायला हवी, अशी मागणीही आ. जगताप यांनी केली. शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या रस्त्यावर छेडछाडीचे प्रकार घडतात, काळ्या काचा लावून, विनाक्रमांकाची वाहने फिरतात, त्यांचीही तपासणी व्हायला हवी. गावठी कट्ट्यांचा वापर वाढला आहे, त्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पोलीस ठाण्यातून अनेक पोलीस कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. वारंवार तेथेच काम करताना दिसतात. अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा, अनेक वर्ष एका जागी राहील्याने या कर्मचाऱ्यांचे हितसंबंध तयार होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शहरात राजकीय मतभेदातूनही जागेवर ताबा मारण्याचे प्रकार घडत आहेत, लोढा हाइट्स इमारत त्याचेच उदाहरण आहे. बाहेरून बांधकाम कंपन्या नगरमध्ये येऊन इमारती उभारत असताना या वादाचा त्रास सहन करावा लागत आहे. काहीजण या त्रासाला कंटाळून नगर सोडून निघून गेले, या घटनांना वेगळे वळण लागत आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करावी, अशी मागणी आ.जगताप यांनी केली.