नवी दिल्ली – भारताने आज रविवारी अफगाणिस्तानातून चारशे नागरीक मायदेशी आणले आहेत. तीन विमानातून हे नागरीक येथे आणण्यात आले आहेत. त्यापैकी हिंडेन विमानतळावर उतरलेल्या भारतीय लष्कराच्या सी -17 या मालवाहून विमानातून 107 भारतीय आणि 23 अफगाणि नागरीकांना दिल्लीत आणण्यात आले आहे. मायदेशी परतल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येत आहे.
एअर इंडियाच्या विशेष विमानातून 87 भारतीय आणि 2 नेपाळी नागरीकांना दुशानबे येथून दिल्लीत आणण्यात आले होते. त्यांना काल काबुलहून ताजिकीस्तानच्या राजधानीत हलवण्यात आले होते. आज त्यांना तेथून दिल्लीला आणण्यात आले आहे. 135 भारतीयांच्या एका गटालाही काल काबुलहून अमेरिका आणि नाटो विमानाच्या मदतीने दोहा येथे नेण्यात आले होते. दोहातून या नागरीकांनाहीं भारतात आणण्यात आले आहे.
थेट काबुलहून 168 नागरीकांना घेऊन येणारे विमानही भारतात आले आहे. त्यात अफगाणिस्तानातील खासदार अनारकली होनारयार आणि नरेंद्रसिंग खालसा आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. दरम्यान हवाईदलाचे आणखी एक विमान काबुलहून 168 जणांना भारतात घेऊन येण्यासाठी निघाले असल्याचेही वृत्त आहे.