मुंबई – भारताची चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारताने चांद्रयान-4 मोहिमेसाठी जपान सोबत हातमिळवणी केली आहे. इस्रोची आगामी चंद्रमोहिम भारत आणि जपान यांची संयुक्त मोहिम असेल. त्यामुळे, चांद्रयान-3 च्या यशानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा चांद्रयान-4 मोहिमेकडे लागल्या आहेत.
चांद्रयान-4 मोहिमेचे नाव लुपेक्स मोहिम असे ठेवण्यात आले आहे. चांद्रयान-3 ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-4 मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्यात येतील. गेल्या काही वर्षांतील संशोधनामुळे चंद्रावर पाणी असल्याचे संकेत मिळाले आहेत.
चंद्रावरील पाण्याचे साठे, तेथील पाण्याची नेमकी उपलब्धता याचा अभ्यास केला जाईल. मानवाच्या अस्तित्वासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याचा शोध मानव आणि भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी फार महत्त्वाचा ठरेल.
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले असून आता ते माहिती गोळा करून इस्रोला पाठवेल, ज्याचा फायदा आता चांद्रयान-4 मोहिमेसाठी होणार आहे. आता पुढील 14 दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील माहिती इस्रोला पाठवणार आहे.