नवी दिल्ली – गेल्या दहा वर्षांत भारतातील वाहन उद्योग विस्तारला आहे. भारतात तयार होणारी वाहने देशातील ग्राहकाबरोबरच परदेशातही पाठवली जातात. आता भारतातील वाहन उद्योग जगातील चौथ्या क्रमांकाचा उद्योग झाला आहे. वाहन उद्योगाने गाठलेल्या या उद्दिष्टाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहन उद्योगाचे अभिनंदन केले आहे. सिआम या भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पाठविलेल्या संदेशात मोदी यांनी म्हटले आहे की, भारतातील वाहन उद्योगाने प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होण्याची गरज आहे. त्यासाठी या उद्योगाला आवश्यक ती मदत केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.
भारतात मॅन्युफॅक्चरिंग वाढावे याकरिता उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. याचा वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर कंपन्यांनी पर्यावरण पूरक वाहनांची निर्मिती करण्यावर भर द्यावा अशी सूचना पंतप्रधानांनी केली. वाहतूक कार्यक्षमरित्या झाल्यानंतर त्याचा विकास वाढण्यात सर्वात जास्त फायदा होतो. भारतातील वाहतूक वाढल्यानंतर त्यामुळे विकास दर वाढण्यात मदत होईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान सिआम या संघटनेने म्हटले आहे की, लवकरच भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाहन उत्पादक देश होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सध्या भारतात तयार होणाऱ्या वाहनांचे काही सुटे भाग आयात केले जातात. पुढील 25 वर्षांमध्ये भारतातील वाहन उद्योग पूर्णतः स्वावलंबी होईल असे या संघटनेने म्हटले आहे. आगामी काळात पर्यावरण पूरक वाहन निर्मितीवर भर देण्यात येईल आणि काही वर्षांमध्ये भारतातील सर्व वाहने उत्सर्जन कमी करणारी असतील.
करोनाचा वाहन उद्योगावर प्रचंड परिणाम झाला होता. मात्र आता वाहन क्षेत्रातील काही भाग पुन्हा रुळावर आला आहे. मात्र काही भागावरील परिणाम अजूनही चालू आहे. कार उत्पादन वाढत आहे आणि कारची मागणी वाढत आहे. मात्र दुचाकीची मागणी अजून पूर्वपदावर आली नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील कंपनी कर कमी असल्यामुळे कंपन्यांना विस्तारीकरणाचे प्रकल्प हाती घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले.