चेन्नई – रवीचंद्रन अश्विनच्या शतकाने आधी धावांचा डोंगर उभारत अश्विनसह अक्सर पटेलने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडची अवस्था 3 बाद 53 केली व विजयाची चाहूल लागली.
आपल्या दुसऱ्या डावात भारताने 286 धावा केल्या व इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे कठीण आव्हान उभे केले. त्यानंतरइंग्लंडचे तीन गडी केवळ 53 धावांत तंबूत धाडत विजयाच्या उंबरठ्यावर पाऊल भक्कमपणे टाकले.
आता इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अजून 429 धावांची गरज असून भारताला या सामन्यातील विजयासह चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यासाठी सात बळींची गरज आहे. सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 3 बाद 53 धावा झाल्या असून डॅनियल लॉरेन्स 19 तर कर्णधार ज्यो रूट 2 धावांवर खेळत आहेत.
विजयासाठी 482 धावांचे आव्हान घेत मैदानात उतरलेल्या इंग्लंडचीसुरूवात अत्यंत खराब झाली. धावफलकावर केवळ 17 धावा असताना डॉमनिक सिबलीला पटेलने पायचीत करत पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने बर्न्सला चकवले व स्लीपमध्ये कोहलीकडून झेलबाद केले. यावेळी नाईट वॉचमन म्हणून जॅक लीच खेळपट्टीवर आला मात्र, पटेलने त्यालाही रोहित शर्माकरवी झेलबाद केले व पाहुण्यांची अवस्था 3 बाद 50 अशी बिकट केली. यावेळी कर्णधार रूट फलंदाजीला आला व तेव्हाच पटेलने त्यालाही चकवले होते मात्र, डीआरएस घेऊनही हे अपिल पंचांनी फेटाळून लावले व रूटला जीवदान मिळाले. आता त्यांना विजयासाठी आणखी 429 धावांची गरज असून भारतीय संघाला सात बळींची गरज आहे.
त्यापूर्वी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी रवीचंद्रन अश्विनने संयमी पण दमदार शतकी खेळी केली व त्यामुळे भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी 482 धावांचे अशक्य आव्हान उभे केले. फिरकी गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या डावातील दीडशतकवीर रोहित शर्माही लवकर परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजडारालाही अपयश आले.
अजिंक्य रहाणेलाही या सामन्यात चमक दाखवता आली नाही. मात्र, कर्णधार विराट कोहलीने अश्विनच्या साथित पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. या दोघांनी इंग्लंडच्या फिरकी तसेच वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. या दोघांनी 96 धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला व मोठी आघाडी मिळवून दिली.
कोहलीही भरात आला असे वाटत असतानाच 62 धावांवर पुन्हा एकदा ऑफस्पीनर मोईन अलीचाच बळी ठरला. अलीनेच कोहलीला पहिल्या डावशात बाद केले होते. कोहली बाद झाल्यानंतर अश्विनने सामन्याची सुत्रे आपल्याकडे घेत संघाची धावसंख्या वाढवली. तळाच्या फंलदाजांना हाताशी धरत अश्विनने पाचवे कसोटी शतक फटकावले. अश्विनने 148 चेंडूचा सामना करताना 106 धावांची खेळी केली. त्यात त्याने 14 चौकार व एक षटकार फटकावला.
अश्विन व कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला केळपट्टीवर उभे राहता आले नाही. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही निराशा केली. पहिल्या डावातील दीडशतकवीर रोहित शर्मा 26 धावांवर बाद झाला. शुभमन गिल 14 तर, पुजारा 7 धावांवर बाद झाला. पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी करणारे पंत व रहाणे अनुक्रमे 8 व 10 धावा काढून परतले. अष्टपैलू अक्सर पटेलही 7 धावांवर बाद झाला.
कुलदीप यादवने 3 तर, इशांत शर्मानेही 7 धावा केल्या. अश्विनला इशांत व महंमद सिराजने उपयुक्त साथ दिल्यानेच त्याचे शतक पूर्ण होऊ शकले. सिराज 16 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून मोईन अली व जॅक लीच यांनी प्रत्येकी 4 बळी मिळवले. ऑलिव्हर स्टोनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – सर्वबाद 329 धावा. इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 134 धावा. भारत दुसरा डाव – सर्वबाद 286 (रवीचंद्रन अश्विन 106, विराट कोहली 62, रोहित शर्मा 26, महंमद सिराज नाबाद 16, मोईन अली 4-98, जॅक लीच 4-100, ऑलिव्हर स्टोन 1-21). इंग्लंड दुसरा डाव – 19 षटकांत 3 बाद 53 धावा. (रोरि बर्न्स 25, डॅनियल लॉरेन्स खेळत आहे 19, ज्यो रूट खेळत आहे 2, अक्सर पटेल 2-15, रवीचंद्रन अश्विन 1-28).