काठमांडू: दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजविले आहे. नेमबाजी, बॅडमिंटन, खो-खो, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल अशा अनेक क्रीडा प्रकारात भारताने आपला दबदबशा प्रस्थापित केला आहे. भारताच्या पुरुष व महिला संघांनी खो-खो स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावत स्पर्धेवर आपला दबदबा सिद्ध केला. भारताच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशचा 16-9 असा पराभव करताना सुवर्णपदकाची कमाई केली. तर महिला संघाने यजमान नेपाळवर 17-5 अशी सहज मात करत सुवर्णपदक पटकावले. पुरुष गटात नेपाळने बांगलादेशचा तर महिला गटात बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव करत तिसरे स्थान पटकावले.
अर्थात यजमान नेपाळने स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान मिळविले असले तरी भारताला त्यांना मागे टाकण्यासाठी आता फार मेहनत करावी लागणार नाही. भारतीय खेळाडूंनी पहिल्या दोन दिवसांतच पदकांची चाळिशी ओलांडत दर्जा सिद्ध केला. 18 सुवर्णपदकांसह एकूण 43 पदके भारताने मिळविली. यात ऍथलेटिक्स, नेमबाजी, व्हॉलिबॉलमध्ये भारतीय खेळाडूंनी दबदबा राखला. नेपाळ संघ 23 सुवर्णांसह एकूण 44 पदकांसह अव्वल स्थानावर आहे.
ऍथलेटिक्समध्ये भारताने दहा पदकांची कमाई केली. यात चार सुवर्ण, चार रजत आणि दोन ब्रॉंझपदकांचा समावेश आहे. भारताच्या अर्चना सुसिंद्रन (100 मी.), एम. जश्ना (उंच उडी), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी) आणि अजयकुमार सरोज (1500 मी.) यांनी सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अर्चनाने 11.80 सेकंद वेळ नोंदवून स्पर्धेतील वेगवान धावपटूचा मान मिळवला. तिने श्रीलंकेच्या तनुजी अमाशा (11.82 से.), लक्षिका सुगंद (11.84 से.) यांना मागे टाकले. महिलांच्या उंच उडीत जश्ना हिने 1.73 मीटर कामगिरी नोंदवून सुवर्णपदक मिळवले. रुबिना यादवने 1.69 मीटर कामगिरी नोंदवून ब्रॉंझपदक भारताच्या खात्यात जमा केले.
पुरुषांच्या उंच उडीत कुशारेने 2.21 मीटर कामगिरीसह अव्वल क्रमांक पटकावला. त्याचा सहकारी चेतन बालसुब्रह्मण्यम याने 2.16 मीटर कामगिरीसह रजतपदक निश्चित केले. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सरोजने 3 मिनिटे 54.18 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक, अजितकुमारने 3 मिनिटे 57.18 सेकंद वेळ नोंदवून रजतपदक, तर नेपाळच्या तानका कार्कीने 3 मिनिटे 50.20 सेकंद वेळ नोंदवून ब्रॉंझपदकाची कमाई केली. महिलांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कविता यादवला रजतपदकावर समाधान मानावे लागले. तिने 35 मिनिटे 7.95 सेकंद वेळ नोंदविली. त्या आधी चंदाने (4 मि. 34.51 से.) महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रजतदक, चित्रा पलाकीझने (4 मि. 35.46 से.) ब्रॉंझपदक मिळवले. श्रीलंकेच्या उदा कुबुरालागे (4 मि. 34.34 से.) हिने सुवर्णपदक मिळवले.
नेमबाजीतही वर्चस्व
भारतीय नेमबाज मेहुली घोषने सुवर्णपदक मिळवले. श्रीयांका सादान्गीने (250.8) रजत, तर श्रेया अगरवालने (227.2) गुणांसह ब्रॉंझपदक मिळवले. 10 मीटर एअर रायफलमधील सांघिक सुवर्णही भारताच्या खात्यात जमा झाले. पुरुषांच्या 50 मीटर 3 पी प्रकारात चेनसिंगने सुवर्णपदक मिळवले. 25 मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये योगेश सिंगने सुवर्ण, तर गुरप्रीतसिंगने रजतपदक पटकावले.
पदकांच्या शर्यतीत भारताची बाजी
भारताने पदकांच्या शर्यतीत बाजी मारताना 71 पदकांची कमाई केली. भारताने 32 सुवर्ण, 26 रजत व 13 ब्रॉंझ अशी 71 पदके मिळविली आहेत. अर्थात आत्ता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असला तरी भारताने बॅडमिंटनमध्ये आणखी 8 पदके निश्चित केल्याने भारत पदकतालिकेत अव्वलस्थानी राहणार आहे. आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने 29 पदके मिळवत आघाडी घेतली.