माधव विद्वांस
भारतातील महायोगी, युगप्रवर्तक तत्त्वज्ञ, स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, महाकवी आणि अखिल विश्वाला अध्यात्म आणि योगाची शिकवण देणारे “योगीराज अरविंद’ यांचे आज पुण्यस्मरण (निधन 5 डिसेंबर 1950). त्यांचे संपूर्ण नाव अरविंद कृष्णधन घोष. अरविंदांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे आईवडील काहीकाळ इंग्लंडमधे वास्तव्यास होते. कृष्णधन तेथील जीवन पद्धतीकडे आकर्षित झाले होते. त्यांना पाश्चात्त्य शिक्षण, चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. आपल्या मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषा आत्मसात केल्या होत्या.
इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांच्या विचारांची त्यांच्यावर छाप पडली होती. केंब्रिज येथे शिकत असताना त्यांच्या मनात स्वदेशप्रेमाची भावना जागृत झाली व क्रांतिकारकांच्या संपर्कात आले आणि ते “इंडियन मजलिस’ या संघटनेचे कार्यवाह बनले. त्यांच्या वडिलांना आपल्या मुलाने आयसीएस व्हावे ही इच्छा होती; पण ती पूर्ण होऊ शकली नाही. ते आयसीएस परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले. फेब्रुवारी 1893मध्ये अरविंद भारतात आले.
भारतात परतल्यानंतर बडोदा येथे महाराजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. तेथील महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. तेथे ते बंगाली आणि संस्कृत या भाषा शिकले तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान व वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला.
याच काळात ते स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले व लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. ते मुंबईच्या “इंदुप्रकाश’ या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मते मांडू लागले. दरम्यान ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मे 1908 मध्ये अलीपूर बॉम्ब प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतरच त्यांच्यावर खटला चालला. अलीपूर कारागृहात विवेकानंदांची पहिली भेट झाली. त्यानंतर एका वर्षाच्या तुरुंगवासानंतर खटल्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली व त्यांना सोडण्यात आले. त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. “कर्मयोगीन’मध्ये प्रकाशित झालेल्या “माय कंट्रीमेन’ या लेखाच्या आधारे इंग्रज त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याचा प्रयत्न करीत होते. एप्रिल 1910मध्ये वॉरंट काढले गेले. तुरुंगातून सुटल्यावर पण पोलिसांच्या ससेमिऱ्याला वैतागून चंदननगर येथे मोतीलाल रॉय यांच्या घरात लपून बसले. त्यामुळे त्या वॉरंटची अंमलबजावणी होऊ शकली नाही कारण ते फ्रेंच वसाहत पॉंडेचेरी येथे पोहोचले होते.
1910 मध्ये अरविंदांनी सर्व राजकीय घडामोडींपासून निवृत्ती घेतली आणि ते पॉंडेचेरी येथे गेले व आयुष्याच्या अखेरपर्यंत तेथेच योग साधना करीत राहिले. येथे त्यांनी आध्यात्मिक अभ्यासाची एक पद्धत विकसित केली. त्यांनी आत्मिक अनुभूतीवर विश्वास ठेवला. 1926 मध्ये श्री अरबिंदो आश्रमाची स्थापना झाली. योगीराजांना अभिवादन.