दोहा/अबुधाबी – आधी अबुधाबीमध्ये एका भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन आणि नंतर कतारचा दौरा; तर त्याआधी फाशीची शिक्षा ठोठावली गेलेल्या आठ भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणण्याचा चमत्कार… गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील भारतीय मुत्सद्देगिरीला पूर्णपणे नवी उंची दिली आहे.
अरब जग भारताच्या आजच्याइतके जवळ कधीच नव्हते. पण मुत्सद्देगिरीचे जग इतके सोपे नसते. त्यात जितका फायदा होतो तितका तोटा होण्याचा धोका असतो. भारताची पश्चिम आशियाशी असलेली ही नवीन जवळीक इस्रायलपासून इराणपर्यंत सर्वांच्या नजरेत असेल.
इराणशी व्यवहार करण्याचे आव्हान
युएई हा नेहमीच प्रगतीशील देश राहिला आहे. यूएईशी चांगले संबंध निर्माण करून मोदी सरकारने अरब देशांमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. युएईचे प्रमुख आणि मोदी यांचे संबंध खूप घट्ट आहेत.
यामुळेच युएईमध्ये हिंदू मंदिरासाठी जमीनही उपलब्ध करून देण्यात आली होती. आता इराण आणि अरब देशांना कसे सांभाळता येईल, हे भारताला आपल्या रणनीतीने दाखवावे लागेल. ही गोष्ट चीनने कधीच साध्य केली आहे. भारतासाठीही या प्रदेशातील या सर्व देशांशी समतोल संबंधांची नितांत गरज आहे.
नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द
ऑगस्ट २०२२ मध्ये, कतारच्या गुप्तचर संस्थेने दोहा येथे कथित हेरगिरी प्रकरणात आठ भारतीय नागरिकांना अटक केली. ते लोक एका खाजगी कंपनीत काम करायचे. कतारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाणबुडीवर हेरगिरी केल्याचा आरोप केला आणि त्यांना तुरुंगात पाठवले. या प्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
नोव्हेंबर २०२३ मध्ये, भारत सरकारने कतारमधील उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले. यासोबतच राजनैतिक प्रयत्नही तीव्र करण्यात आले, ज्याचा परिणाम असा झाला की प्रथम त्यांची फाशीची शिक्षा कारावासात बदललली गेली आणि नंतर ते भारतात परतले.
कतारसाठी भारताची बाजारपेठ महत्त्वाची
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हे प्रकरण हाताळले आणि सुटकेसाठी मैदान तयार केले. विशेष म्हणजे ही सुटका अशा वेळी झाली जेव्हा दोन्ही देशांमध्ये द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) बाबत महत्त्वपूर्ण करार झाला होता. हा करार २० वर्षांसाठी करण्यात आला असून यामध्ये ७८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.
भारताच्या पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड (पीएलएल) कंपनीने कतारची सरकारी कंपनी कतार एनर्जीसोबत हा करार केला आहे. या कराराअंतर्गत कतार भारताला दरवर्षी ७.५ दशलक्ष टन गॅस निर्यात करेल. या गॅसपासून वीज, खते आणि सीएनजी भारतातच बनवले जाईल. कतारच्या भारतासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना पंतप्रधान मोदींनी व्यावसायिक बळ दिले आहे.