नवी दिल्ली – “मेक इन इंडिया’ मोहिमेच्या अनुषंगाने भारताने चालवलेले राष्ट्रीय प्रयत्न जगाच्या विपरीत नाहीत किंवा ते केवळ स्वत:च्याच फायद्यासाठी नाहीत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
ते सोमवारी राजदूतांच्या एका परिषदेत बोलत होते. काही देशांना इतरांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या जागतिक व्यवस्थेच्या श्रेणीबद्ध संकल्पनेवर किंवा तथाकथित वर्ल्ड ऑर्डरवर भारत विश्वास ठेवत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगामी एरो इंडियाबद्दल राजदूतांना माहिती देण्यासाठी आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये राजनाथ सिंह म्हणाले, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मानवी समानता आणि प्रतिष्ठेच्या तत्त्वाद्वारे प्रेरीत आहेत. हे एरोस्पेस प्रदर्शन पुढील महिन्यात बेंगळुरू येथे होणार आहे.
जेव्हा आम्ही कोणत्याही राष्ट्राशी भागीदारी करतो तेव्हा ते सार्वभौम समानता आणि परस्पर आदराच्या आधारावर असते. भारताचा स्वावलंबी तत्त्वाचा उपक्रम हा त्याच्या भागीदार देशांसोबतच्या भागीदारीच्या नवीन आदर्शाची सुरुवात आहे. त्यामुळे “मेक इन इंडिया’च्या दिशेने सुरू असलेले आमचे राष्ट्रीय प्रयत्न वेगळेपणाचे नाहीत किंवा ते केवळ भारताच्या लाभापुरतेच मर्यादित नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.