मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच भारतातील बड्या कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर तीन दिवसानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक जवळजवळ दीड टक्क्यांनी वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 846 अंकांनी वाढून 60,747 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 241 अंकांनी म्हणजे 1.35 टक्क्यांनी वाढून 18,101 अंकावर बंद झाला.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना चांगला आधार मिळाला. महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंडसइंड बॅंक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांक उंचावले.
टिसीएस कंपनीचा ताळेबंद बाजार बंद झाल्यानंतर जाहीर होणार होता. टायटन, बजाज फिन्सर्व, मारुती या कंपन्यांना विक्रेता मारा सहन करावा लागला. शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,902 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
दक्षिण कोरिया, चीन, हॉंगकॉंगमधून सकारात्मक संदेश आले. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होण्याची शक्यता असल्यामुळे आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. तर अमेरिकेमध्ये मंदी निर्माण होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. या कारणामुळे अमेरिका व्याजदरात जास्त वाढ करणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारचे निर्देशांक वाढले.