कोलंबो – श्रीलंकेत सध्या जी अस्थिरता आणि हिंसाचाराची स्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने श्रीलंकेत लष्कर पाठवण्यास सुरूवात केली असल्याच्या वृत्ताचा भारताने स्पष्ट इन्कार केला आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने बुधवारी स्पष्टपणे नमूद केले की या अनुषंगाने वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या पुर्णपणे निराधार आहेत.
तथापी भारताचा श्रीलंकेच्या लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिक पुनरुत्थानाला पूर्णपणे पाठिंबा आहे असेही उच्चायुक्त कार्यालयाने म्हटले आहे. श्रीलंकेत सध्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारताने श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी येथे लष्कर धाडले आहे असे वृत्त तेथील सोशल मिडीयावरून तसेच मुख्य प्रवाहातील मिडीयातून दिले जात होते.
तशी भारताची कोणतीही भूमिका नाहीं असे भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने आज स्पष्ट केले.श्रीलंकेतील पळून जाणाऱ्या राजकीय नेत्यांना भारतात आश्रय दिला जात असल्याच्या वृत्ताचाही भारताने इन्कार केला आहे.