-अमित डोंगरे
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजपासून सुरू होत असलेली बॉक्सिंग डे कसोटी अनेक कारणांनी गाजत आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दुसऱ्या डावात 36 अशी नीचांकी धावसंख्या नोंदवली व भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला. ज्यांना क्रिकेटमधलेही काही कळत नाही ते देखील बोलायला लागले. खरेच आहे इतकी वाईट फलंदाजी केल्यावर मुकाही बोलायला लागतो. पहिल्या कसोटीत झालेल्या भूकंपानंतर आता दुसऱ्या कसोटीद्वारे डीझास्टर मॅनेजमेंट होणार का, हाच खरा प्रश्न आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ही सुमार कामगिरी झाल्यावर राजकीय पक्षात कसे नैतिक वगैरे म्हणतात ती जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची मागणी केली जाते तशीच कोहलीच्याबाबतीतही सुरू झाली. बोलायला काय कष्ट पडत नाहीत, प्रत्यक्ष मैदानावर केळायला गुणवत्ताच लागते. एक गोष्ट खरी आहे की केवळ गुणवत्ता असून चालत नाही तर ती सिद्धही व्हावी लागते.
पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा यांच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे; पण केवळ भाषिक अभिनयासारखी ती कथन केली जाऊ नये, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरणही व्हावे. आता दुसऱ्या कसोटीत शॉ, साहा यांना संघात जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत असताना पंतबुवा काय करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सराव सामन्यात पंतने शतक फटकावले हे वृत्त असे दिले गेले की जणू त्याने जागतिक क्रिकेटमधील सगळे विक्रम साकार केले की काय. सराव सामना वेगळा आणि प्रत्यक्ष कसोटी सामना वेगळा.
इथे कोहलीसह रहाणेसारखे तंत्रशुद्ध फलंदाजही चाचपडत असल्याचे दिसून येते तर पंतची काय कथा. त्याला इतक्या वेळा संधी दिली आहे की भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळ संघातून आत-बाहेर केलेला तो एकमेव खेळाडू ठरेल. पाच दिवसांचा सामना आपण केवळ अडीच दिवसांतच संपला. सामना पूर्ण पाच दिवसही खेळण्याची जिद्द आपण दाखवू शकलो नाही. काही दिवसांपूर्वी एक प्रचंड ज्ञानी व्यक्ती भेटले होते. ते सांगत होते की, क्रिकेट हा खेळ आहे, त्यात हारृजीत ही व्हायचीच.
एक प्रश्न पडतो, की जीत ही नेहमी दुसऱ्या संघाची होते आणि हार केवळ आपल्याच संघाची होते असे का. ऍडलेड कसोटीतील सुमार कामगिरी लवकरात लवकर विसरून फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही प्रकारात भारतीय संघाने कात टाकावी व हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करावी हीच अपेक्षा आहे. यजमान संघालाही डेव्हिड वॉर्नर व सीन अबॉट यांच्या दुखापतीमुळे पर्यायी खेळाडूंना खेळवावे लागणार आहे व नेमकी हीच गोष्ट भारतकीय संघाच्या पथ्यावर पडणार आहे. याचा फायदा घेतला पाहिजे.
रहाणेचे नेतृत्व आक्रमक असते हे पाहिले आहे. आता त्याने नेतृत्व करताना डीझास्टर मॅनेजमेंटही करावी. कारण याही कसोटीत पराभव झाला तर आकाशच फाटेल आणि मग ठीगळं जोडूनही काही उपयोग होणार नाही.