मेलबर्न –नियमित कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज महंमद शमी यांच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्धच्या आजपासून येथे सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीतही यजमान ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड राहणार आहे. सातत्याने मागणी होऊनही निवड समिती व संघ व्यवसथापनाने लोकेश राहुल याला संघात स्थान दिलेले नाही.
ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने 8 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव केवळ 36 धावांत आटोपला होता. त्यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावरच संघाचे या मालिकेतील भवितव्य अवलंबून राहणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत. या मालिकेतील या कसोटीसह सिडनीत होत असलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत कोहली व शमी खेळणार नसल्याने भारतीय संघाची फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीही कमकुवत बनली आहे.
त्यांच्या अनुपस्थितीत हनुमा विहारीच्या जागी रवींद्र जडेजा, कोहलीच्या जागी लोकेश राहुलची निवड होईल ही अपेक्षा याही सामन्यात फोल ठरली. त्याला पुन्हा एकदा डावलले असून आग्रवालसह शुभमन गील डावाची सुरुवात करेल. त्याला या कसोटीद्वारे पदार्पणाची संधी देण्यात आली आहे, यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या जागी ऋषभ पंतला, तसेच वेगवान गोलंदाज शमीच्या जागी महंमद सिराजला संधी देण्यात येणार आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पृथ्वी शॉ याच्या जागी शुभमन गीलला कसोटी पदार्पणाची संधी दिली जाणार आहे.
या कसोटीत सरस कामगिी करण्याची भारतीय संघाकडून अपेक्षा आहे. मात्र, संघात अनुभवी खेळाडूंपेक्षा जास्त युवा खेळाडू आहेत. तसेच यातील काही खेळाडू तर ऑस्ट्रेलियात प्रथमच खेळत आहेत. त्यामुळे बदली कर्णधार रहाणेला या सगळ्यांची मोट बांधून त्यांच्याकडून यशस्वी कामगिरी करून घेण्याचे आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच त्याला स्वतःलाही नेतृत्वासह वैयक्तिक कामगिरीही सिद्ध करावी लागणार आहे.
दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया संघालाही खेळाडूंच्या दुखापतीने ग्रासले आहे. सलामीवीर धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर व वेगवान गोलंदाज सीन अबॉट यांना याच कारणाने या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. अशा स्थितीत त्यांची फलंदाजी मुख्यत्वे माजी कर्णधार स्टिव्हन स्मिथ याच्यावरच अवलंबून राहणार आहे. अर्थात, जो बर्न्स, ऍलेक्स कॅरी, कर्णधार टीम पेनी, मार्नस लेबूशेन, मॅथ्यू वेड व कॅमेरुन ग्रीन यांनीदेखील सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने त्यांच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान भारताच्या संमिश्र अनुभवी गोलंदाजांसमोर आहे.
गोलंदाजीबोबत बोलायचे झाले तर पॅट कमिन्स, मिशेल मार्श व जोश हेझलवूड यांनी पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजीची दाणादाण उडवली होती. या सामन्यातही त्यांच्या वेगवान व स्विंग गोलंदाजीसमोर यशस्वी होण्यासाठी भारताच्या सर्वच फलंदाजंना अत्यंत जबाबदारीने खेळावे लागणार आहे. त्यांचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनने देखील पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारावर वर्चस्व राखले आहे. या दोन खेळाडूंदरम्यान यापूर्वीही रंगलेली जुगलबंदी लियॉननेच जिंकली असल्याने त्याच्या फिरकीसमोरही भारतीय फलंदाज कसा खेळ करतात याकडेही लक्ष राहणार आहे.
रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष
भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या अनुपस्थिती अजिंक्य रहाणेकडे आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रहाणेला आपला खेळ उंचावण्यात अपयश आले आहे. अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेपासूनच याही मालिकेत त्याला अपयशाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत संघाचे नेतृत्व करताना तरी त्याचा खेळ उंचावणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय संघ – मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ – टीम पेनी (कर्णधार व यष्टिरक्षक), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लेबूशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हीस हेड, कॅमेरुन ग्रीन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिशेल स्टार्क, नाथन लियॉन.