नवी दिल्ली – इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीने फेसबुकचे (META) सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) आणि गुगलचे सीईओ (google ceo) सुंदर पिचाई यांना एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रातून आगामी निवडणुकांवेळी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी तटस्थ रहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.(India Aghadi letter to CEOs of Facebook)
वॉशिंग्टन पोस्ट या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने नुकतेच लेख प्रसिद्ध केले. त्यामध्ये फेसबुक, व्हॉटस्ऍप आणि यूट्युबचा कल भारतातील सत्तारूढ भाजप आणि मोदी सरकारकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आणि जातीय द्वेषाला चिथावणी देणाऱ्या प्रचाराला संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून चालना मिळत असल्याचा आरोपही त्या लेखांमध्ये करण्यात आला आहे. संबंधित लेखांचा आधार घेऊन इंडियाने पत्र पाठवले आहे. इंडिया (india aghadi) ही भारतातील 28 राजकीय पक्षांची आघाडी आहे.
आमच्या आघाडीतील घटक पक्षांची 11 राज्यांमध्ये सत्ता आहे. आमची आघाडी देशातील जवळपास निम्म्या मतदारांचे प्रतिनिधित्व करते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्याकडे लक्ष वेधून इंडियाने झुकेरबर्ग आणि पिचाई यांना पत्र पाठवले आहे.