नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील पक्षांनी आघाडीचे संयोजकपद नाकारल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार काय करणार? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर लवकरच देशाला मिळणार आहे. मात्र, यासाठी 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या भगवान श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अयोध्येतील श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याची चर्चा पंडित दीनदयाल मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात ऐकायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या समारंभाला उपस्थित राहणार असून ते याच दिवशी काही तरी मोठा निर्णय घेवू शकतात, अशीही चर्चा आहे.
देशातील भाजपविरोधी तमाम विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधणारे नितीशकुमार इंडीया आघाडीतील घटक पक्षांवर नाराज आहेत. सर्वप्रथम त्यांनीच पाटणा येथे आघाडीची बैठक बोलावून विरोधी पक्षांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ‘हेचि फळ काय मज श्रमाला’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामुळे नितीशकुमार इंडीया आघाडीपासून वेगळे होण्याचा विचार करीत असल्याची चर्चा आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांची इंडीयाचे संयोजक होण्याची इच्छा होती. परंतु, तृणमूल कॉग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दिल्लीतील बैठकीत कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे नितीशकुमार प्रचंड दुखावले गेले आहेत.
एवढेच नव्हे तर, बिहारमधील जेडीयू आणि राजद सरकारमध्ये सगळे काही सुरळीत नसल्याची चर्चा आहे. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदी बनवावे आणि नितीशकुमार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची धुरा सांभाळावी, असे लालूप्रसाद यादव यांना वाटत आहे.
परंतु, नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदावर राहूनच भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करायचे आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्या या स्वप्नावर विरजण सोडले आहे.
यामुळे नितीशकुमार नाराज झाले नसते तरच नवल! या नाराजीचा फायदा आपल्याला लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कसा होईल? याची रणनिती आखण्याचे काम भाजपचे चाणक्य करीत आहेत. त्यांना 22 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमालाही बोलाविण्यात आले आहे. शिवाय, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने रालोआत परत येण्याचे आवाहन सुशासनबाबू यांना केले असल्याची सुध्दा चर्चा आहे.
नितीशकुमार यांनी ‘विचार कर के बतायेंगे’ एवढंच आश्वासन भाजपच्या नेत्याला दिले आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्यामुळे भाजपच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर नितीशकुमार मोठा निर्णय घेतील आणि रालोआसाठी तो फायद्याचा असेल असे भाजपला वाटत आहे.