नवी दिल्ली (वंदना बर्वे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अशा उमेदवारांना उतरविण्याची योजना आखली आहे ज्यांना बघताच इंडीया आघाडीतील राजकीय पक्षांना ही लढत सोपी नसल्याची जाणीव होईल. मोदी यांना हरविण्यासाठी इंडीया आघाडी भाजप उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार उतरविण्याची तयारी करीत आहे. परंतु, मोदी- शहांची जोडी हा डावही उधळून लावणार आहेत.
भाजपचे लोकसभेतील उमेदवारांची निवड करण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहचले असल्याची चर्चा आहे. निवडणुकीची घोषणा झालेली नाही. परंतु, अयोध्येतील 22 जानेवारीचा सोहळा आटोपल्यानंतर भाजपकडून कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली जावू शकते.
महत्वाचे म्हणजे, भाजपने यावेळी चारशेपेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यामुळे उमेदवाराची निवड ही बहुस्तरीय विचार विनिमय करून केली जात आहे. यात उमेदवाराची क्षमता, लोकसंपर्क, सोशल मिडीयावरील सक्रीयता, मतदारसंघातील लोकांचे मत आणि जिंकण्याची क्षमता आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच उमेदवाराचे नाव निश्चित केले जात आहे.
यासाठी भाजपने अलिकडेच नमो ॲपवर आपल्या खासदारांबद्दल लोकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले होते. लोकांकडून मिळालेला अभिप्राय पक्षाने खूप गंभीरपणे घेतला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि खासदारांना मैदानात उतरविण्याचा भाजपचा फॉर्मुला कमालीचा यशस्वी झाला आहे. विद्यमान उमेदवारांच्या जागी नवीन चेहरा देण्याची योजना सुध्दा यशस्वी झाली होती. आता हाच फार्मुला लोकसभेच्या निवडणुकीतही अंगीकारला जाणार आहे, असे समजते.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी ही यादी मकर संक्रांतीनंतर जाहीर केली जाईल अशी चर्चा होती. परंतु आता ही यादी मकरसंक्रातीच्या आधी सुध्दा येवू शकते अशी चर्चा आहे.
कारण, भाजपने मागच्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी पितृ पक्षाच्या काळातच जाहीर केली होती. यानंतरही विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. यामुळे लोकसभेतील उमेदवारांची यादी सुध्दा जाहीर केली जावू शकते. मात्र, गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला किंवा कामगिरी फारशी चांगली नव्हती अशा मतदारसंघातील उमेदवारांची नावे या यादीत असण्याची शक्यता आहे. उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळावा ही त्यामागची भूमिका आहे.
महत्वाचे म्हणजे, भाजपच्या विरोधात एकच संयुक्त उमेदवार द्यायचा या इंडीया आघाडीच्या निर्णयाची हवा निघेल असा उपाय भाजपने केला आहे. दीर्घकाळापासून राज्यसभेत असलेल्या खासदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवायचे आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना राज्यसभेत आणायचे अशीही भाजपची योजना आहे.
राज्यसभेच्या ज्या खासदारांची नावे चर्चेत आहे त्यात महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि नारायण राणे यांचा समावेश आहे. ओडिशातून धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून मनसुख मांडविया, हिमाचल प्रदेशमधून भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि दर्शन सिंग, उत्तर प्रदेशमधून अनिल जैन, सुधांशू त्रिवेदी, डॉ. दिनेश शर्मा, कांता कर्दम, नीरज शेखर आणि सुरेंद्र सिंग नागर, छत्तीसगडमधून सरोज पांडे, केरळमधून व्ही. मुरलीधरन, बिहारमधून राकेश सिन्हा आणि सुशील कुमार मोदी, जम्मू-काश्मीरमधून गुलाम नबी आझाद, राजस्थानमधून अश्विनी वैष्णव, आसाममधून भुवनेश्वर कलिता यांच्या नावाची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, मध्यप्रदेशातील ज्योतिदरित्य सिंधिया, सुमेर सिंग सोलंकी आणि त्रिपुरातील बिप्लब कुमार देब, माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि माजी खासदार सय्यद जफर इस्लाम यांनाही लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले जावू शकते.