नवी दिल्ली – भारतात अनेक वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंविरोधात काम करत असलेल्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे. द्रमुकसह कॉंग्रेसचे नेते सनातन धर्मव्यवस्थेवर हल्ले करत असताना कॉंग्रेसचे शीर्ष नेते त्याबाबत बोलत नाहीत. समस्त भारतीयांना यामुळे आता लक्षात आले आहे की, विरोधकांची कथित ‘इंडिया’ आघाडी’ ही हिंदूविरोधी पक्षांची संघटना आहे, असे प्रतिपादन केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
‘भारत जोडो’ या नावाने खोट्या यात्रा काढणारे कॉंग्रेसचे नेते वास्तविकपणे “भारत तोडो’साठी काम करत आहेत. कॉंग्रेसचे नेते शत्रुदेश चीनच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठक करतात. युरोपमध्ये जाऊन भारतविरोधी वक्तव्ये करतात आणि अमेरिकेत सांगतात की, भारताच्या एकतेला भाजपापासून धोका आहे, याकडे लक्ष वेधून सीतारामन पुढे म्हणाल्या की, प्रदीर्घ काळ सत्तेपासून दूर रहावे लागत असल्याने, कॉंग्रेसचे मनोबल खालावले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले की, मूलत: एक आर्थिक मंच असलेली जी 20 समूह क्रिप्टो मालमत्ता, जागतिक कर्ज आणि ब्रेटन वुड्स संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज यासारख्या मुद्द्यांवर काम करत आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने सर्व मुद्द्यांवर एकमत निर्माण केले आहे आणि दिल्ली घोषणेवर नाणेनिधी आणि जागतिक बॅंक “खूप समाधानी” आहेत.