South Africa Vs India 3rd ODI (Paarl) – यजमान दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यात सुरु असलेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा निर्णायक सामना आज (गुरुवार) येथील बोलॅंड पार्क स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी १ सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता हा तिसरा सामना जिंकताना मालिकाही जिंकण्यासाठी दोन्हीसंघ सज्ज बनले आहेत.
लक्षवेधी
– ऋतुराज, तिलकचे अपयश भोवतेय
– पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता
– राहुल, रिंकू व श्रेयसवरच मदार
– अर्शदीप, कुलदीपसह अक्सरला संधी शक्य
– चहलला संधीची शक्यता धूसर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ११६ धावांत गुंडाळले होते व दमदार फलंदाजी करत ९ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून जिंकताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
पहिल्या सामन्यात भारताची फलंदाजी व गोलंदाजी अत्यंत नियोजनबद्ध झाली मात्र, दुसर्या सामन्यात गोलंगदाजांची कामगिरी फारशी सरस झाली नाही. या उलट या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर दडपण राखले. या सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारल्यावरही भारतीय संघाला गोलंदाजांच्या अपयशामुळे सामना गमवावा लागला. पहिल्या सामन्यात भारताच्या अर्शदीप सिंगने ५ तर आवेश खानने ४ गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडेच मोडले होते.
मात्र, दुसऱ्या सामव्यात याच गोलंदाजांवर वर्चस्व राखत त्यांचा नवोदित फलंदाज ‘नी डे झोर्जीने नाबाद शतकी खेळी केली. त्याला साथ देताना रीझा हेंड्रीक्सने अर्धशतक फटकावले होते. या सामन्यात अर्शदीपला केवळ एकच बळी मिळवता आला तर आवेश खानला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. आता तिसरा सामना मालिकेचा निर्णय लावणारा ठरणार असल्याने दोन्हीसंघांना फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यात कलामीचे सातत्य राखावे लागणार आहे.
सुदर्शनवरच लक्ष….
भारतीय संघात या मालिकेतील पहिल्या लढतीत अर्धशतकी खेळी करणारा साई सुदर्शन याच्यावरच सर्वांचे लक्ष राहणार आहे. त्याने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात नाबाद ५५ धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळेच भारतीय संघाला मालिकेत विजयी सलामी देता आली. दुसर्या सामन्यातही त्याने ६२ धावांची खेळी करत भारतीय संघाच्या द्विशतकी धावांमध्ये मोलाचे योगदान दिले.
आता तिसऱ्या सामन्यातही तो अर्धशतक सार करण्यात यशस्वी ठरला तर त्याच्या नावावर पदार्पणातच अर्धशतकांची हॅटट्रीक साकरण्याचा विक्रम जमा होणार आहे. तसेच त्याचे या कामगिरीच्या जोरावर भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या संघातील स्थानही जवळपास निश्चित होणार आहे.