– नंदिनी आत्मसिद्ध
परदेशात जॉब करणारे तसेच व्यावसायिक भारतीय काही पैसे भारतातील आपल्या कुटुंबाकडे पाठवतात. यामुळे आपल्याकडे परकीय चलनसाठ्यात वाढ होते, हे एकप्रकारे आपल्यासाठी लाभदायक आहे.
वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने, म्हणजेच जीएसटीच्या माध्यमातून सरकारकडे जमा होत असलेल्या अप्रत्यक्ष करात महिनागणिक अपेक्षेपेक्षा जास्त वाढ सुरू आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये डिसेंबरच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष करापोटी निव्वळ संकलन 20 टक्क्यांनी वाढले आहे. 17 डिसेंबर 2023 पर्यंत परतावा वजा जाता, प्रत्यक्ष कर म्हणून केंद्राकडे 13 लाख 70 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. गतवर्षी याच काळात 11 लाख 35 हजार कोटी रुपयांचा प्रत्यक्ष करमहसूल जमा झाला होता.
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही सुवार्ताच म्हणावी लागेल. मात्र 2022-23 या करनिर्धारण वर्षासाठी 7 कोटी 40 लाखांहून अधिक व्यक्तींनी प्राप्तिकर विवरणपत्र भरले आहे. तर त्यापैकी पाच कोटी 16 लाख व्यक्तींनी त्यांचे करदायित्व शून्य असल्याचे दाखवले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. गेल्या चार वर्षांत शून्य करदायित्व असणार्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. वास्तविक प्रत्यक्ष करातून अधिक उत्पन्न मिळवले पाहिजे. त्यामधून सरकारला असंख्य विकासकामे करता येतील. अप्रत्यक्ष कराचा गरिबांना अधिक फटका बसत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, परदेशांतून पाठवल्या जाणार्या रकमा, म्हणजेच रेमिटन्सेसच्या संदर्भात भारत नवे विक्रम करत आहे. 2023 मध्ये 125 अब्ज डॉलर्सची निधी पाठवणी (रेमिटन्सेस) भारतात करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत ही 13 टक्के वाढ आहे. ‘मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफ’ असे शीर्षक असलेला जागतिक बँकेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये परदेशांतून होणार्या निधी पाठवणीमध्ये भारताचा नंबर पहिला आलेला आहे, असे म्हटलेले आहे. आपल्या नंतर मेक्सिको, चीन, फिलिपाइन्स आणि इजिप्त यांचा क्रमांक लागतो. अर्थात, अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश असल्यामुळे, तो निधी पाठवणीमध्ये सुद्धा आघाडीवरील देश आहे, हे गृहीत आहे. त्यात कोणतेही आश्चर्य नाही.
आज जगामध्ये नोकरीसाठी स्थलांतरण करणार्या कामगार व अधिकार्यांची संख्या प्रचंड आहे. कामगार, अधिकारी हे कमावलेल्या काही उत्पन्नातील हिस्सा मायदेशातील आपल्या कुटुंबीयांकडे पाठवत असतात. त्यालाच ‘रेमिटन्सेस’ असे संबोधले जाते. परदेशांतून जेवढी निधीपाठवणी होते, तिचा उपयोग देशाला आपली कर्जफेडीची क्षमता वाढवण्यासाठी होत असतो. शिवाय कर्जउभारणी करताना ज्या देशात अधिक निधी पाठवणीची रक्कम येत असते, त्या देशास कर्जउभारणीसाठी तुलनेने कमी व्याज भरावे लागते.
2023 मध्ये भारताकडे आलेली निधीपाठवणीची रक्कम चीनच्या तुलनेत दुप्पट होती. यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून भारतातील डिजिटायझेशन प्रक्रिया विस्तारली असून, त्यामुळे परदेशांतून भारतात सहजपणे निधी हस्तांतरण होत असते. शिवाय मोबाइल फोन्स घरोघरी असल्यामुळे वित्तीय सेवांत क्रांती झाली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यादरम्यान निधी हस्तांतरण करण्याकरता ‘यूपीआय पेनाउ’ ही व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे आता व्यवहारातील खर्च कमी व्हावा आणि जास्तीत जास्त निधी परदेशांतून भारतात यावा, यासाठी अशीच व्यवस्था अन्य देशांबाबतसुद्धा केली जात आहे. 2024 मध्ये भारतात 135 अब्ज डॉलर्स इतकी निधीपाठवणी केली जाईल, असा अंदाज आहे. मात्र, मध्यपूर्वेतील तसेच ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’चे सदस्य असलेल्या देशांमधील घडामोडी कोणत्या दिशेने होणार आहेत, यावर देखील बरेच काही अवलंबून असेल. कारण, भारतात येणारा 29 टक्के निधी हा या देशांमधून येतो.
युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारवाढ झाली आहे आणि भारतातील असंख्य लोक तेथे नोकर्या करत आहेत. अमेरिकेतील कर्मचार्यांच्या पगारातही चांगली वाढ झाली आहे. शिवाय उच्च उत्पन्नदर देशांमधील महागाई कमी झाली आहे. त्यामुळे भारतातून तेथे नोकरी करण्यासाठी गेलेल्या कामगार वा कर्मचार्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय भारताने परदेशस्थ भारतीय नागरिकांसाठी उत्तम बचत योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे विदेशी चलनातील ठेवींमध्ये परदेशी निधी आकर्षित होऊ लागला आहे.
जास्त व्याजदर, करसवलती अशी आकर्षणे भारताने देऊ केली आहेत. भारतातील परदेशस्थ भारतीयांच्या ठेवींमध्ये यंदा दहा टक्क्यांची वाढ होऊन, 143 अब्ज डॉलर्स इतक्या रकमा या ठेवींमध्ये जमा झाल्या आहेत. ठोकळ राष्ट्रीय उत्पादन किंवा जीडीपीच्या तुलनेत ताजिकिस्तान, टोंगा, समोआ, लेबानन आणि निकाराग्वुआ या देशांनी सर्वाधिक रेमिटन्सेसची रक्कम संकलित केली आहे.
जीडीपीच्या तुलनेत भारतात येणार्या विदेशी निधी हस्तांतराच्या रकमा फक्त 3.4 टक्के आहेत. याचा अर्थ, आपण आणखीन मोठ्या प्रमाणात हा निधी आकर्षित करून घेऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.