IND vs PAK – आज ऑस्ट्रलियातील मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने मागील टी-२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानला ४ गडी राखून धूळ चारली. भारताकडून विराट कोहलीने मैदानावर धावांचा पाऊस पाडला. त्याने ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची मॅचविनिंग परी खेळली. त्यासोबतच हार्दिक पंड्याने भारतासाठी अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत ३ गडी बाद केले आणि फलंदाजीत त्याने ३७ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले.
#T20WorldCup #INDvPAK : कोहलीची धावांची आतिषबाजी, अतितटीच्या लढतीत भारताचा पाकवर विजय
भारताने कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना स्वस्तात गमावले. कारण संघाची धावसंख्या अवघ्या २६ धावांवर असताना भारताने या तीनही फलंदाजांना गमावले होते. यानंतर संघाच्या विजयाची जबाबदारी पूर्णपणे विराट कोहली खांद्यावर आली होती. यांनतर विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सोबत घेत भारताच्या विजयाची खिंड लढवली. सामान्यांच्या शेवटी-शेवटी महत्त्वाच्या क्षणी हार्दिक बाद झाला अन भारताचा विजय कठीण वाटू लागला. मात्र खेळपट्टीवर असलेल्या कोहलीने भारताच्या ‘विराट’ अपेक्षांना विजयाशी गळाभेट घालून दिली.
अखेरच्या १२ चेंडूत काय-काय घडलं…
भारतीय संघाला शेवटच्या दोन षटकात ३१ धावांची आवश्यकता होती. १९ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी हरिस रौफच्या हातात चेंडू होता. पहिल्या चेंडूवर हार्दिकने १ धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर कोहलीने १ धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर हार्दिकला एकही धाव घेत आली नाही. चोथ्या चेंडूवर त्याने एक धाव घेत विराटला स्ट्राईक दिली. यानंतर हॅरिस रौफच्या पाचव्या आणी सहाव्या चेंडूवर विराटने एकानंतर एक दोन षटकार ठोकले.
For his stunning match-winning knock, @imVkohli bags the Player of the Match award. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/mc9usehEuY #TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/xF7LfA4Od5
— BCCI (@BCCI) October 23, 2022
आता भारताला शेवटच्या (२० व्या ) षटकात १६ धावांची गरज होती. पाकिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नवाजच्या हातात चेंडू होता. त्याने पहिल्याच चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या हार्दिक पांड्याला बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक ३७ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजीला आलेल्या कार्तिकने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर कोहलीने दोन धावा घेतल्या. यानंतर नवाजच्या चौथ्या चेंडूवर कोहलीने षटकार ठोकला. नवाजने टाकलेला चोथा चेंडू उंचीमुळे पंचांनी नो बॉल दिला. यानंतर नवाजने फ्री हिटमध्ये वाईड बॉल टाकला. चौथ्या चेंडूवर कोहलीने बायमध्ये तीन धावा घेतल्या. कार्तिक पाचव्या चेंडूवर बाद झाला. त्याला एक धाव करता आली. शेवटच्या चेंडूवर नवाजने प्रथम वाईड टाकला आणि त्यानंतर अश्विनने एक धाव घेत सामन्याचा विजयी शेवट केला.