मेलबर्न : विराट कोहलीची अफलातून वादळी फलंदाजी आणि हार्दिक पंड्या व रवीचंद्रन अश्विनने दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने या स्पर्धेच्या सुपर 12 गटात विजयी सलामी दिली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या नाट्यमय सामन्यात भारताने गेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 6 बाद 160 धावा करत विजय साकार केला. कोहलीने भारताच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावताना 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीत कोहलीने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 पण उपयुक्त खेळी केली. हार्दिकने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकार लगावले. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. कर्णधार रोहित शर्मा आणि केल राहूल प्रत्येकी 4 धावा काढून माघारी परतले. सूर्यकुमार यादवने 15 धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक 1 धाव काढून बाद झाला.
What a game of cricket! 👊🏻
India win a humdinger at the MCG 🤩 #T20WorldCup | #INDvPAK | https://t.co/H9EE5QNfGD pic.twitter.com/kbgItlGRhE
— ICC (@ICC) October 23, 2022
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एका क्षणी 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर हार्दिक पांड्याने विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी 78 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. शेवटच्या पाच षटकात भारताला विजयासाठी 60 धावांची गरज होती. 16व्या षटकात सहा धावा आणि 17व्या षटकात सहा धावा झाल्या.
18व्या षटकात कोहलीने गियर बदलला आणि शाहीन आफ्रिदीच्या षटकात तीन चौकार मारले. भारताने 18व्या षटकात 17 धावा केल्या. टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात 31 धावांची गरज होती. कोहलीने 19व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. त्या षटकात हरिस रौफ गोलंदाजी करत होता.
भारताला शेवटच्या (20 व्या ) षटकात 16 धावांची गरज होती. मोहम्मद नवाज गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक37 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. कोहलीने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. उंचीमुळे गोलंदाजाने टाकलेला चौथा चेंडू अंपायरने नो बॉल दिला. यानंतर नवाजने फ्री हिटमध्ये वाईड बॉल टाकला. चौथ्या चेंडूवर कोहलीने बायमध्ये तीन धावा घेतल्या. कार्तिक पाचव्या चेंडूवर बाद झाला. त्याला एक धाव करता आली. शेवटच्या चेंडूवर नवाजने प्रथम वाईड टाकला आणि त्यानंतर अश्विनने एक धाव घेत सामना जिंकला. पाकिस्तानकडून हॅरीस रौफ व महंमद नवाज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
Innings Break!
Three wickets apiece for @hardikpandya7 & @arshdeepsinghh and a wicket each for @BhuviOfficial & @MdShami11 as Pakistan post a total of 159/8 on the board.
Scorecard – https://t.co/X970NaDN4n #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/Nypo6k5ZRn
— BCCI (@BCCI) October 23, 2022
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले. त्यानंतर अर्शदीपने भरात असलेल्या महंमद रिझवानचाही अडसर दूर केला. 2 बाद 15 अशा बिकट स्थितीतून शान मसुद व इफ्तेकार अहमद यांनी डाव सावरला व तिसऱ्या गड्यासाठी 76 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, त्याचवेळी महंमद शमीने इफ्तेकारला बाद केले व ही जोडी फोडली.
इफ्तेकारने आपल्या 51 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करताना हार्दिक पंड्यानेही पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांच्या धावसंख्येला लगाम लावला. पाकिस्तानच्या शादाब खान, हैदर अली, महंमद नवाज व असीफ अली यांनी साफ निराशा केली. डावातील अखेरच्या षटकांत मसुदने तळातील फलंदाज शाहिन शाह आफ्रीदी व हॅरीस रौफ यांना साथिला घेत संघाला दीडशतकी धावांपर्यंत मजल मारुन दिली.
आफ्रीदीने 16 तर हॅरीसने नाबाद 6 धावा केल्या. मसुदने आपल्या नाबाद 52 धावांच्या संयमी खेळीत 42 चेंडूत 5 चौकार फटकावले. भारताकडून हार्दिक पंड्या व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 8 बाद 159 असा रोखला गेला.
संक्षिप्त धावफलक –
भारत : 20 षटकांत 6 बाद 160 धावा. (सूर्यकुमार यादव 15, हार्दिक पंड्या 40, विराट कोहली नाबाद 82, रवीचंद्रन अश्विन नाबाद 1, हॅरीस रौफ 2-36, महंमद नवाज 2-42).
पाकिस्तान : 20 षटकांत 8 बाद 159 धावा. (इफ्तेकार अहमद 52, शान मसुद नाबाद 52, शाहीन शाह आफ्रीदी 16, हॅरीस रौफ नाबाद 6, हार्दिक पंड्या 3-30, अर्शदीप सिंग 3-32, भुवनेश्वर कुमार 1-22, महंमद शमी 1-25).