साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील पूर्ण षटकांचा खेळ न झाल्याने आयसीसीच्या नियमानुसार आज राखीव दिवशी 98 षटक टाकली जातील. दरम्यान आज सहावा आणि अखेरचा दिवस आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना विजय मिळवण्याची संधी आहे. शिवाय सहाव्या दिवशी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे आज दिवसभर पूर्ण षटके खेळवली जातील. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला 249 धावांत गुंडाळले. त्यांनी पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 बाद 64 धावा केल्या होत्या.
विजयासाठी ही गोष्ट करावी लागले
कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी सध्या मैदानावर आहे. जर भारत विजय मिळवण्याच्या दृष्टीने खेळत असेल तर त्यांना वेगाने धावा कराव्या लागतील. पुजारा 12 तर विराट 8 धावांवर खेळत आहे. जर भारताने न्यूझीलंडसमोर 180 ते 200 धावांचे लक्ष्य ठेवले तर गोलंदाजांवर सर्व जबाबदारी येईल. भारतीय फलंदाजांना हे देखील लक्षात ठेवावे लागले ती त्यांनी गोलंदाजांना 10 विकेट घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जर कसोटी अनिर्णित झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागणार आहे.
याव्यतिरिक्त भारतीय संघाने पहिल्या डावात 250 पेक्षा कमी धावा केल्यावर अधिक तर वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये 93 पैकी 54 कसोटीत पराभव तर 20 मध्ये विजय मिळाला आहे.
पाचव्या दिवशी 10 विकेट
काल पाचव्या दिवशी पावसामुळे अर्धातास उशिरा खेळ सुरू झाला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 249धावांवर बाद केले. भारताकडून मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या. त्याने 26 षटकात 8 मेडन टाकल्या. तर इशांत शर्माने 25 षटकात 9 मेडन ओव्हरसह 3 विकेट घेतल्या. काल दिवसभरात 10 विकेट पडल्या त्यातील 2 भारताच्या तर 8 न्यूझीलंडच्या होत्या.
न्यूझीलंडकडे संधी
भारताकडे 32 धावांची आघाडी आहे आणि आठ विकेट शिल्लक आहेत. जर न्यूझीलंडने भारताच्या फलंदाजांना लवकर बाद केले तर त्यांना विजय मिळवता येऊ शकतो. भारताला 150 धावांपर्यंत रोखले तर न्यूझीलंडला विजयाची संधी आहे. अशा परिस्थितीत त्यांनी वेगाने धावा कराव्या लागतील.