India vs England 3rd Test (Rajkot) :- यजमान भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून येथे सुरु होत आहे. या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज बनले आहेत. या दोन संघातील आतापर्यंत झालेल्या कसोटीत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे मालिकेत आघाडी घेण्यासाठी व वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करतील. तसे पाहायला गेले तर दोन्ही संघांना प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसणार आहे.
इंग्लंडबात बोलायचे झाले तर त्यांच्या जॅक लीच या भरात असलेल्या फलंदाजाने माघार संपूर्ण घेतली आहे. तसेच अबुधाबीला सरावासाठी गेलेल्या इंग्लंड संघातील काही खेळाडूंना भारताचा व्हिसा मिळवण्यात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच जॉनी बेअरस्टो व वेन फोक्स या खेळाडूंना येत असलेले अपयश त्यांच्या चिंतेचे मुख्य कारण बनत आहे. स्टार फलंदाज ज्यो रूटही सातत्याने धावा करत नसल्याने त्यांच्या गोलंदाजांना मोठ्या धावसंख्येचे पाठबळ मिळत नसल्याने भारतासमोर मोठे आव्हानही निर्माण करता आलेले नाही.
भारताच्या बाबतीत बोलायचे तर प्रमुख फलंदाज विराट कोहलीने वैयक्तीक कारणाने संपूर्ण कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच तंदुरुस्त ठरलेला लोकेश राहुलही पूर्ण मॅचफिट नसल्याने या सामन्यात खेळणार नसल्याचे उघड झाले आहे. श्रेयस अय्यरही संघातील स्थान पक्के करु शकलेला नाही. त्यामुळे सलामीवीर यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल या दोघांवरच संघाच्या फलंदाजीचा संपूर्ण भार आहे. कर्णधार रोहित शर्माही सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यातच कोहलीच्या जाही संघात असलेला रजत पाटीदारही दर्जानूसार कामगिरी करु शकलेला नाही. त्यातच राहुलच्या नसण्याने संघाच्या फलंदाजीची मधळी फळी अत्यंत कमकुवत बनली आहे.
आता राहुलच्या जागी संघात नव्याने निवड झालेल्या सर्फराज खानला संधी मिळणार की देवदत्त पडीक्कलला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारी केएस भरत सांभाळत असला तरीही त्याच्याकडून चमकदार कामगिरी अद्याप झालेली नाही. या स्थितीत नवोदित ध्रुव जुरेल कसोटी पदार्पण करु शकतो. गोलंदाजीबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे.
प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या कसोटीसाठी विश्रांती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तो या सामन्यात खेळणार असल्याने तसेच महंमद सिराज संघात परतल्याने संघाची गोलंदाजी बळकट बनली आहे. फिरकीची बाजू रवींद्र जडेजा संघात परतल्याने वरचढ बनली आहे. आता त्याचा समावेश करण्यासाठी अक्सर पटेलला बाहेर ठेवले जाऊ शकते. रवीचंद्रन अश्विनने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने त्याचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे.
जडेजा निर्णायक ठरेल
दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेला डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा संघात परतल्याने संघाच्या गोलंदाजीला बळकटी आली आहे. राजकोटच्या खेळपट्टीचा इतिहास जरी फलंदाजांसाठी लाभदायक असला तरीही तिसर्या दिवसापासूनच डावखुरे फिरकी गोलंदाज जास्त यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे इंग्लंडचा बॅजबॉल असो किंवा पहिल्या चारही क्रमांकावरील फलंदाज यांच्यासाठी जडेजा डोकेदुखी ठरु शकतो.