– अरुण गोखले
सावधान! हा शब्दबोध आपल्या कानावर अगदी बालपणापासून पडत असतो. पावलोपावली ही सावधानतेची सूचना आपल्याला दिली जाते. बालपणात खाताना, खेळताना, दंगा मस्तीचा निर्भेळ आनंद लुटत असताना ही ‘अरे सावधानतेने खेळा रे. काळजी घ्या, निष्काळजी राहू नका. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. खाताना घाईगडबड करू नका’ अशा सूचना, असे इशारे दिले जातात. त्या सर्वांमागचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपली सुरक्षा.
त्यानंतर बालपण संपले की मुंज होते. त्यावेळी आपल्या कानावर पुन्हा ‘शुभ मुहूर्त सावधान…’ हा शब्द पडतो. इथे तो शब्द आपल्याला आपली कर्तव्यबुद्धी जागविण्यासाठी असतो. एकाग्र चित्ताने अभ्यास करा. जिज्ञासू वृत्तीने नाना विषय, कलाकौशल्याचे अध्ययन करून कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून तयार व्हा, हे सांगण्यासाठी असतो. त्या भावी काळासाठी घडण्यासाठी हाच शुभ काळ आहे,
याचे संकेत देत असतो. त्यानंतर नोकरी, व्यवसाय, छंद यात बस्तान बसविले की घरची मंडळी आपले दोनाचे चार हात करण्याच्या तयारीला लागतात. आपणही त्या मंगलविवाह बंधनात गुंतायला तयार असतो. तिथेही हे मंगल मिलन पती आणि पत्नी ह्यांना किती नव्या जबाबदार्या घेऊन पेलायचे आहे, याची पूर्वसूचना देण्यासाठीच हा ‘सावधान’ असा इशारा असतो.
संसार प्रपंच्यात तर ही सावधानता आपल्याला अनेक बाबतीत आणि ती वेळोवेळी बाळगावी लागते. मग ती सावधानता दैनंदिन जमाखर्चाच्या ताळमेळाची असेल, नातेसंबंध टिकविण्याची असेल, व्यक्ती-व्यक्तीतील सुख-संवाद जपण्याची असेल, नाहीतर अगदी घरातल्या बाल आणि वृद्ध यांच्या आरोग्याची असेल. प्रत्येक बाबतीत आपल्याला हे असे सदैव सावध राहावेच लागते.
पुढे वाढत्या कौटुंबिक जबाबदार्या, घरातील ज्येष्ठांच्या आरोग्य समस्या, आर्थिक ओढाताण, तुमचे स्वत:चे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, जीवनातले कडू-गोड प्रसंग अशा वेळीही हे सावधानतेचे भान राखावेच लागते. एकटेपण, मृत्यूचे भय आणि प्राप्त झालेल्या नर जन्माची आपण खर्या अर्थाने सार्थकता केली नाही याची खंत जीवास लागू नये. काही तरी परमार्थ साधना करावी. प्रत्येक दिवशी ही सावधानता राखणे हेच त्या शब्द बोधाचे खरे अनुकरण होय.