पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आता प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी 1 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत एसटी महामंडळाने “प्रवासी वाढवा अभियान’ हाती घेतले आहे. या कालावधीत किमान दोन टक्क्यांहून अधिक प्रवासी भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट देताना उत्पन्न कमी झाल्यास कारवाईचा इशाराही महामंडळाने राज्यभरातील आगरांचे अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे.
राज्यभरात खासगी वाहनांनी निर्माण केलेली स्पर्धा, एसटीचे वाढत जाणारे भाडे, ब्रेकडाऊनची अधिक संख्या, आगार आणि स्थानकातील गैरसोयी आदींमुळे गेल्या काही वर्षांत एसटीची प्रवासी संख्या बरीच घटल्याने आर्थिक निकड निर्माण झाली. त्यामुळे तोटाही वाढत गेल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणेही कठीण झाले. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा धडाका लावत प्रवासी व उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट दिले आहे.
एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरण होत आहे. मार्च 2019 मध्ये प्रवासी भारमान 64.71 टक्के होते. मार्च 2020 मध्ये हेच उद्दिष्ट 66.71 टक्के देण्यात आले आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वात जास्त व सर्वात कमी उत्पन्न आणणाऱ्या तीन चालक आणि वाहक यांची नावे आगारातील फलकावर नमूद केली जाणार आहेत. तसेच प्रवासी व उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी, पर्यवेक्षकांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशाराही परिपत्रकातून दिला आहे.
अभियानाची संकल्पना
ज्या ठिकाणी थांबे देण्यात आले नाहीत; परंतु प्रवासी उपलब्ध आहेत अशा ठिकाणाहून प्रवासीही बसमध्ये घेऊन जाणे. विभागीय कार्यालयातील अधिकारी वेळोवेळी आगार आणि स्थानकात भेट देतील. मार्ग तपासणी पथकाद्वारेही बसगाड्यांची तपासणी करणे, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी बस संचलनातील गाड्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.