पिंपरी – भोसरी ते वासुली मार्गावरील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. यामुळे मोशी, चाकण, दावडमळा, बिरदवडी, आंबेठाण, भांबोली या मार्गाने जाणा-या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
या मार्गावर एमआयडीसी असल्याने बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये कामगारांची संख्या अधिक असते. यासह शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी व इतर कामनिमित्त या मार्गाने ये-जा करण्याऱ्या प्रवाशांचेही प्रमाण अधिक असते. यामुळे या बसला नेहमीच गर्दी असते. मात्र, बसच्या फेऱ्या अपुऱ्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना तासनतास बस येण्याची वाट पहावी लागत आहे. कमी फे-या असल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. वेळेत बस उपलब्ध न झाल्यास संबंधित ठिकाणी पोचता येत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
पूर्वी भोसरी स्थानकातून रात्री सव्वाआठला शेवटची बस सुटायची. आता ही बस पावणे सातलाच सुटते. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ होत आहे. शेवटची बस पूर्वीच्या वेळेनुसारच सोडण्यासह दिवसभरातही बसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.