मुंबई – जून अखेर संपलेल्या तिमाहीत महाराष्ट्र बॅंकेच्या नफ्यात 106 टक्के वाढ होऊन हा नफा 208 कोटी रुपये झाला आहे. बॅंकेचे व्याजातून मिळालेले उत्पन्न वाढले असून अनुत्पादक मालमत्ता कमी झाल्यामुळे बॅंकेला चांगला ताळेबंद जाहीर करता आला.
गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत बॅंकेला 101 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी सांगितले की, करोनामुळे परिस्थिती खराब असतानाही बॅंकेने चांगली कामगिरी केली आहे. व्याजातून मिळालेल्या उत्पन्नात 29 टक्के वाढ होऊन हे उत्पन्न 1 हजार 406 कोटी रुपये इतके झाले आहे.
बॅंकेला अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळाले असून या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 6.35 टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी ही अनुत्पादक मालमत्ता 10.93 टक्के इतकी होती. निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 4.10 टक्क्यांवरून 2.22 टक्के इतकी झाली आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांतर्गत 1,487 कोटी रुपयांच्या कर्जाची फेररचना करण्यात आली आहे. पुढील तिमाहीत आणखी 600 कोटी रुपयांच्या कर्जाची फेररचना होण्याची शक्यता आहे. वसूल न होणाऱ्या कर्जाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बॅंकेला या तिमाहीत यासाठी कमी तरतूद करावी लागली आहे.
या तिमाहीत बॅंकेच्या कर्ज वितरणात 14 टक्के वाढ झाली आहे तर ठेवीत 14 टक्के वाढ झाली आहे. रिटेल, कृषी आणि लघु उद्योग क्षेत्रासंबंधीचा व्यवसाय 16 टक्क्यांनी वाढला आहे. रिटेल कर्जपुरवठा 19 टक्क्यांनी, छोट्या उद्योगाचा कर्जपुरवठा 18 टक्क्यांनी वाढला आहे. आगामी वर्षात कर्जपुरवठा 14 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता बॅंकेने व्यक्त केली आहे. बॅंकेने जाहीर केलेल्या ताळेबंदानंतर बॅंकेच्या शेअरचा भाव 2.33 टक्क्यांनी कमी झाला.