नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आला आहे. स्थूल अर्थव्यवस्था भक्कम आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणामुळे आगामी काळात बॅंकांचा कर्जपुरवठा वाढण्याची शक्यता महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी व्यक्त केली.
उद्योग क्षेत्रात त्याचबरोबर सर्वसाधारण अर्थव्यवस्थेत आशादायक वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी पिटीआयशी बोलताना सांगितले. रिटेल क्षेत्राबाबत बोलताना ते म्हणाले की घरासाठीचे कर्ज वाढत आहे. मात्र सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन क्षेत्रासंदर्भात काही मर्यादा आहेत. मोटार कंपन्या हा प्रश्न सोडवतील आणि हे क्षेत्रही वेगाने वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कृषी क्षेत्रातील कर्ज पुरवठयात दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे आणि जर चांगला पाऊस पडला तर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅनयुफॅक्चरींग क्षेत्र वगळता इतर कंपन्यांकडून कर्जाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. केंद्र सरकारने भांडवली खर्चात वाढ केल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातूनही कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महाराष्ट्र बॅंकेच्या कर्ज पुरवठयात 2021-22 मध्ये 27 टक्क्याची वाढ होऊन हा कर्जपुरवठा 1.36 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. या बॅंकेच्या ठेवीमध्ये 16 टक्क्याची वाढ होऊन 2.02 लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कर्ज पुरवठा 1.07 लाख कोटी रुपये तर ठेवी 1.74 लाख कोटी रुपयाच्या होत्या. पुणे स्थित बॅंक ऑफ महाराष्ट्राचा 31 मार्च 2022 अखेर एकूण व्यवसाय 20.49 टक्क्यांनी वाढून 3.39 लाख कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेचा एकूण व्यवसाय 2.81 लाख कोटी रुपये इतका होता.