पुणे – घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पानशेत धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने पानशेत धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणांतून विद्युतनिर्मिती केंद्रातून 600 क्युसेक तर सांडव्याद्वारे 1194 असे एकूण 1794 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे.
शहरात आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू असला तरी पाणलोट क्षेत्रात मात्र, शनिवारी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सलग सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने खडकवासला प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होत आहे.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत खडकवासला धरणात 29 मिमी, पानशेत आणि वरसगाव प्रत्येकी 9 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 24 तासांत या धरणांमधील पाणीसाठा पाव टीएमसीने वाढला आहे, एकूण साठा 27.74 टीएमसी (95 टक्के ) झाला आहे. तर पानशेत आणि वरसगाव ही दोन्ही धरणे 100 टक्के भरलेली असून टेमघर धरणात 76 टक्के तर खडकवासला धरणात 73 टक्के साठा उपलब्ध आहे. खडकवासलातून 1054 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.