पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडून ताकद मिळत आहे. अनेक वर्षांपासून रेंगाळलेले प्रश्न सुटत आहेत. त्यामुळे मंत्रीपद केव्हा मिळेल, या चर्चेपेक्षा नागरिकांचे प्रश्न सुटण्याला मी अधिक महत्त्व देतो, असे स्पष्ट मत भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार, भाजपचे माजी शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
“दै. प्रभात”च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी आमदार लांडगे शनिवार (दि.23) उपस्थित होते. यावेळी त्यांनी “डिजिटल प्रभात”शी संवाद साधला. याप्रसंगी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न व्हीजन-2020 अंतर्गत सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. 1993 पासून 2018 पर्यंत शहरातील 25 लाख मेट्रिक टन कचऱ्यावरील प्रक्रियेचा प्रश्न रेंगाळलेला होता. “वेस्ट टू एनर्जी” या प्रकल्पाद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मोशी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ललित कलासारख्या नामांकित महाविद्यालयाच्या शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
आंद्रा धरणातून 100 एमएलडी शहराला अतिरिक्त पाणी मिळाले आहे. तसेच भाम-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. शहरातील नागरिकांच्या डोक्यावर शास्तीची टांगती तलवार होती. 460 कोटी रुपये माफ करण्यासाठी पाठपुरावा केला. एक्झीबेशन सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. रेड झोनची हद्द निश्चित नसल्याने शहराच्या विकासाला अडथळा येत होता. ही हद्द ठरवून देण्याबाबत निवेदन दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हद्द ठरविण्याबाबत शासनाने आदेश दिले असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने बळीराजा दुःखात आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस होऊ दे. तसेच करोनासारख्या महामारीचा पुन्हा सामना करावा लागू नये, असे साकडे आमदार लांडगे यांनी गणरायाच्या चरणी घातल्याचे सांगितले.
औरंगजेबाचे नाव देखील घेतले जाऊ नये
समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्यावर आमदार महेश लांडगे विधानसभेत संतापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याबाबत विचारले असता लांडगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचा कारभार चालत आहे. मंदिरे तोडणाऱ्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करणाऱ्या औरंगजेबाचे नाव देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत घेतले जाऊ नये. छत्रपती संभाजी महाराजांना राज्यासह देशातील तरूण आदर्श मानत आहेत. असे असताना औरंगजेबाचे उदात्तीकरण करून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे कृत्य केल्यामुळेच आमदार आझमी यांच्यावर संताप व्यक्त केल्याचे आमदार लांडगे म्हणाले.