मी अकरावीत शिकत असतानाचा तो प्रसंग आहे. महाविद्यालयीन जीवनाचे पहिले वर्ष सरले होते. निकालाचा दिवस उजाडला होता. मनात निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली होती. पास-नापास अशी कसलीही धाकधूक त्या उत्सुकतेत मुळीच नव्हती. निकालाची मॅच जिंकणार याची पुरेपूर खात्री तर होतीच. फक्त कितवा क्रमांक मिळवून किती टक्क्यांनी बाजी मारणार याबाबतची ती उत्सुकता होती.
छान आवरून सावरून नवा कोरा सदरा परिधान करून कॉलेजच्या दिशेने निघालो. कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश करताच मित्र गळाभेट घेत माझे अभिनंदन करू लागले. मला काही समजेना. तेव्हा माझ्या मित्राने कॉलेजच्या फलकावर माझे अभिनंदनपर नाव लिहिल्याचे सांगितले. माझा मुलांत प्रथम तर तिन्ही शाखांत कॉलेजमधून तृतीय क्रमांक आला होता. मी त्या फलकाच्या दिशेने गेलो. माझा एक जिवलग मित्र त्या फलकाकडे न्याहाळून पाहत होता. मला खात्री होती माझे नाव पाहताच त्यालाही तितकाच आनंद होईल. परंतु मी जे पाहिले ते धक्कादायक होते. प्रतीकने हाताची मूठ आवळून जोराने त्या फलकावर आपटली. कदाचित भरपूर अभ्यास करूनही अपेक्षित निकाल न लागल्याचा तो त्रागा होता. खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याने त्याने ही कृती केली होती. नंतर यावरून सर्वांनी त्याच्या वर्तनावर टीकाही केली. असे अनेक प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडत असतात. यातूनच माणसाच्या व्यक्तिमत्वाची खरी पारख होत असते.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचे ध्येय ठरलेले असते. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. जसजसे ध्येय साध्य होण्याच्या अंतिम टप्प्यात असते त्यावेळी आपल्या प्रयत्नांना अधिक गती येत असते. ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचताच आपल्याला त्या ध्येयाव्यतिरिक्त काहीही दिसत नाही. मात्र अशावेळी अचानक यश आपल्याला हुलकावणी देते. अशावेळी आपण आपला त्रागा संतापयुक्त भावनेतून व्यक्त करीत असतो. अनेकदा स्वतःला या वैफल्यातून मानसिक तणावाच्या खाईतही लोटत असतो. तसेच जर कुणी प्रतिस्पर्धी असेल तर त्यावर शाब्दिक किंवा भावना दुखावतील असे प्रहार करतो. परिणामी एक चिडखोर आणि अखिलाडूवृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून जनमानसात प्रतिमा निर्माण होते.
जीवन हा एक आव्हानांचा खेळ आहे आणि प्रत्येकजण या खेळातील एक खेळाडू आहे. या जीवनरूपी खेळात विजय संपादन करण्यासाठी खिलाडूवृत्ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या अधिकारांचा आदर करणे म्हणजे खिलाडूवृत्ती होय. केवळ जिंकण्याच्या भावनेने खेळण्यापेक्षा आनंदाच्या भावनेने खेळण्यात खरी मजा आहे. जीवनमूल्ये जपताना इतरांच्या प्रयत्नांनाही दाद देण्यात खरी खिलाडूवृत्ती दडलेली असते. जीवन जगताना पावलोपावली ही खिलाडूवृत्ती अजमावयाची असते. खिलाडूवृत्तीने आदर, समजुतदारपणा, प्रेम, सहनशक्ती आणि सकारात्मकता यासारखे गुण वाढीस लागत असतात. जिंकण्याचा उन्माद आणि हरल्याचे बोचरे शल्य हे तसे व्यक्तिमत्त्वास घातकच. खिलाडूवृत्ती ही नेहमी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ देत असते.
मोठी आणि सशक्त मानसिकतेची व्यक्तिमत्त्वे ही नेहमी खिलाडूवृत्तीचा स्वीकार करतात. आशिया चषकात रंगलेल्या भारत पाक सामन्यात चहलने फलंदाज उस्मान खानच्या बुटाची लेस बांधत खिलाडूवृत्ती जपली होती. कारण प्रतिस्पर्ध्यापेक्षा त्याच्या अडचणीत त्याला मदत करण्याचा प्रमाणिक मानस त्याने जपला होता. 1988 च्या सियोल ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या लॉरेंस लेम्यूक्सने विजेतेपदाच्या सीमारेषेजवळ जाऊनही विजेतेपदावर पाणी टाकत पाण्यात बुडणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला वाचविण्यास प्रथम प्राधान्य दिले होते. एक जीव वाचविण्यासाठी लॉरेंस लेम्यूक्सने सुवर्णपदकाचाही विचार केला नाही. ही असते ती कमालीची खिलाडूवृत्ती जी सामान्य माणसाला असामान्य बनविते. लारा सारखा विस्फोटक फलंदाज आपल्या मुलासमोर सचिन तेंडूलकरचा आदर्श ठेवतो ही ती खिलाडूवृत्ती.
खिलाडूवृत्ती ही केवळ खेळातच नाही तर जीवनमूल्यातही तितकीच महत्त्वाची ठरते. राजकीय, सामाजिक, कला, साहित्य आणि इतर अनेक क्षेत्रांत हीच खिलाडूवृत्ती व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण नजरेस आणते. आज शुगर, बीपी, फोबिया आणि मानसिक तणावासारख्या आजारांसाठीही ही खिलाडूवृत्ती उत्तम आहे. मनावरचे ओझे उतरवून इतरांचा आदर ठेवून,प्रयत्नशील राहणारा खिलाडूवृत्तीचा माणूस हा नक्कीच आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत असतो.
व्यक्तिमत्त्व
सागर ननावरे