तुमचं पत्र आलंय.’ पोस्टमन काकांची हाक कानावर पडताच, मी हातातलं पुस्तक टाकून देत पत्र घ्यायला पळत जायचो. आमच्या अण्णांचं पत्र असायचं. ते दर महिन्यालाच यायचं; पण ऊन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी येणाऱ्या पत्राची मला एक वेगळीच ओढ लागून राहायची. मग काय, पुस्तक फक्त तोंडासमोर आणि मन मात्र कधीच भुर्रर्रर्रकन उडून गावी पोचलेलं असायचं. कधी एकदाचा शेवटचा पेपर होतोय आणि गावी जायला निघतोय असं व्हायचं. पेटी भरून उरलेले कपडे आणि सामान, गळ्यात अडकवायच्या शबनम पिशवीमध्ये भरताना कायमच माशी शिंकायची.
ऐनवेळी चैन स्लिप व्हायची. तिच्यावर घासायला मेणबत्तीची शोधाशोध चालू व्हायची. एरवी लाइट गेल्यानंतर अंधारातसुद्धा सहज आईच्या हाताला लागणारी मेणबत्ती दिवसा मात्र कुठे गायब व्हायची कुणास ठाऊक! आईच्या मदतीला तिच्या बांगडीत अडकवलेली काटापीन त्यावेळी धावून यायची. रिक्षाला उगाच खर्च नको म्हणून घर ते स्टॅन्ड पर्यंतचा प्रवास पायीच करायचो. मी खूप समजूतदार होतो म्हणून रिक्षासाठी हट्ट करत नव्हतो असं नाही; तर त्याच वाचवलेल्या पैशातून लेमन गोळ्यांचं पाकीट आणि शेंगदाण्याची चिक्की घेता येईल हे माझं गणित असायचं!
बसमध्ये आईच्या सूचना चालूच. “तिथं व्यवस्थित राहायचं. उन्हात खेळायचं नाही. पोरांबरोबर भांडणं करायची नाहीत. उगाच नाकात वारं शिरल्यासारखं करायचं नाही!’ वाऱ्याने उडणारी माझी केसं नीट करताना आई पुन्हा विचारायची, “राहील का लक्षात?’ मी एवढ्या निष्पाप चेहऱ्याने तिच्याकडे पाहून मान हलवायचो की, पुढच्याच क्षणी आई मला मायेने जवळ घ्यायची आणि मांडीवर माझं डोकं ठेहून थोपटून झोपी लावायची.
खड्ड्यात बस आदळली की, कधी माझं डोकं समोरच्या सीटला धडकायचं, नाहीतर वर ढकललेली खिडकी खाडकन खाली आदळताच मला जाग यायची. पप्पांचं लक्ष मात्र वर ठेवलेल्या पिशवीची काटापीन तुटणार तर नाही ना याकडेच असायचं. काही झालं तरी “ती’ आईचीच सोबती. संसाराच्या वाटेवर कितीतरी खाचखळगे आले असतील. त्यातून वाट काढताना कधीच न तुटलेल्या आईसारखीच तीही तेवढीच खंबीर होती! “चला, चुंभळी फाटा आला.’ तिथून आमचे गाव चार-पाच किलोमीटर. फाट्यावर पप्पांना गावातली लोकं भेटायची. “शांतू, जिपडं येईलंच बघ.’
काहीवेळाने समोरून येणाऱ्या जीपला ड्रायव्हरच्या दोन्ही बाजूला लटकलेली माणसं आणि मागे उभी राहिलेल्यांची छतावरून दिसणारी मुंडकी पाहून; मला तरी बसायला जीपचा बोनेटच काय तो तेवढा रिकामा दिसायचा! जीव आणि शिल्लक राहिलेल्या लेमनगोळ्या मुठीत धरून कसंबसं मी गाडीत बसायचो. काही अंतरावर गाडी उताराला लागली की समजायचं, गाव आलं. लोखंडी पत्र्यावर पांढऱ्या पेंटने लिहिलेलं “तांबाराजुरी’ नाव वाचताच वाटायचं, कधी गाडीतून उडी मारून वाड्याकडं पळतोय. पण आईच्या सूचनांची मनाशी बांधलेली गाठ, निदान घर गाठेपर्यंत तरी नको सोडायला म्हणून धीरानं घ्यायचो! तेवढ्या भर उन्हात अण्णा आम्हाला न्यायला यायचे.
एरवी पांढऱ्याशुभ्र कपड्यांची इस्त्री मोडू न देणारे अण्णा मला घट्ट मिठीत घ्यायचे. रस्त्याने जाताना जो तो अण्णांना विचारायचा. “शांतूचा पोरगा ना?’ “हो. नातू माझा. लातूरला असतो. सुट्टीसाठी आलाय.’ शहरात असतो असं अभिमानाने सांगताना त्यांची छाती भरून यायची; तर “नातू माझा’ हे ऐकून माझी! आमच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायला माई दारात उभीच असायची.
तिला बिलगताच माझ्या गालावरून फिरणाऱ्या तिच्या मऊ हातांच्या स्पर्शातली उब आठवली की, आजही मला लहान झाल्यासारखं वाटतं! “माई, आज वांग्याचं भरीत. उद्या उंबराची आमटी. सोबत बाजरीची भाकरी आणि आंब्याचं लोणचंसुद्धा…’ फर्माईशीवर फर्माईशी चालूच असायच्या. माळवदावर कंदिलाच्या उजेडात जेवायला पंगती बसायच्या. कानाच्या मागून अगदी घामाचे ओघळ येईपर्यंत उंबराची आमटी झणझणीत असायची. आमची माई स्वयंपाकात जशी सुगरण तशीच एखाद्या व्यक्तीचं सोंग आणण्यात पटाईत होती. मेलेल्या माणसासाठी रडणाऱ्या बाईचं तिने घेतलेलं सोंग पाहून वाटायचं, वरून जर तो हे पाहत असेल तर तो सुद्धा हसत असेल!
ओसरीत माईच्या कुशीत शांत झोप लागायची. दिवस उजाडला की घरातले सगळेच विहिरीवर पाणी आणायला जायचे. “पोहऱ्याने मला शेंदायला देतेस का? तर येतो.’ पोहऱ्याइतकंच माझं वजन होतं; पण हट्ट करायचोच.
आईच्या भाषेत सांगायचं झालंच तर हळूहळू माझ्या नाकात वारं शिरत होतं! समोर पांडव कुटुंबाच्या वाड्यात मागे चिंचेच्या झाडाखाली गोट्या तर कधी सूर-पारंब्या खेळताना दुपार कधी व्हायची कळायचं नाही. दुपारी पारावर बसून आम्ही चल्लस खेळायचो. उन्हं कलली की समोर पटांगणात उभ्या केलेल्या आमच्या “गाड्या’ घेऊन आम्ही फिरायला निघायचो. सायकलचं टायर आणि ते पिटाळायला एखाद दंडुकं या आमच्या गाड्या! तर कधी कापडाच्या चिंद्यांपासून बनवलेल्या चेंडूने मारामारी खेळताना जाम मजा यायची. पण त्याचवेळेस आईने मला सांगितलेल्या सूचनांच्या “चिंद्या चिंद्या’ केल्या म्हणून पाठीत जोराचा धपाटा सुद्धा मिळायचा. नशीब, माई धावून यायची म्हणून एकावरच भागायचं! “तुला कितीदा सांगितलं मातीत खेळायचं नाही. गुडघा फोडून घेतलास.
जखमेवर खपली धरलीय.’ वर्षे लोटली तरी ती खपली आजही ताजीच वाटते! आज मला हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, चार दिवसांपूर्वी मला व्हॉट्सऍपवर एक मेसेज आला. गावातल्या प्रमोदने टायर गॅंग नावाचा ग्रुप तयार करून त्यात मला ऍड केले होते. मी विचारलं, “असं का नाव दिलंस?’ “दादा, लहानपणीचा आपला खेळ. लाकडी दंडुक्याने सायकलचे टायर पिटाळताना, पायात चप्पल आहे की नाही हे न पाहता किंवा चड्डीला बांधलेला करदुडा जरी निसटला तरी एका हाताने चड्डी सावरत स्टिअरिंग न सोडणारा आपला ग्रुप!’ मी हे वाचून एकटाच हसत होतो. क्षणात माझ्या समोर माझं बालपण उभं राहिलं. दूर हरवलेल्या माई-अण्णांच्या मायेची उब पुन्हा मिळाली. विस्मृतीत गेलेल्या गोड “आठवणींची खपली’ एकदाच काय; कितीदाही काढली तरी “ती’ जखम डोळ्यातून आनंदाश्रूच वाहणार हेच खरं!
अमोल भालेराव