मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते. त्यानंतर राज्यात घेण्यात आलेल्या पुनरिक्षणांतर्गत कार्यक्रमात राज्यातील मतदारांच्या संख्येत तब्बल 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे आता 31 ऑगस्टपर्यंत मतदारांची संख्या 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 वर पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.
मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 4 कोटी 57 लाख 02 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये 10 लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होवून ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे. तर 507 तृतीयपंथी मतदार वाढून त्यांची संख्या आता 2 हजार 593 एवढे झाले आहे.