मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे आम्हाला देखील त्यांच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतरच कळले. मागील चार निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती आयकर विभागाने मागवली आहे. शरद पवार यांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून माहिती मिळाले असतीच. पण जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरु असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत जिथे जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करु, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
तसेच संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीनंतर ईडीचे दिल्लीतले अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.