राज्यातील टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश
मुंबई : राज्यात शिक्षक पात्रता परिक्षा म्हणजेच टीईटी अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर संक्रात ओढावली आहे. कारण अशा शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच या आदेशावर कारवाई करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी अशा सर्वच शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशाचा फटका जवळपास 8 हजार शिक्षकांना बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेली शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्णतेची पात्रता 31 मार्चपर्यंत मिळणे आवश्यक होते. राज्य सरकारकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त वेळ मागण्याची विनंती केली होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सेवा समाप्तीचे आदेश शिक्षकांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना 24 ऑगस्ट 2014 च्या शासननिर्णयानुसार सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरानंतर प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षक संचालनायाने दिले आहेत.प्राथमिक शिक्षक संचालनायाकडून महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय उपसंचालक, प्राथमिक-माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, खासगी शिक्षण संस्थेतील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांसंबंधीचा निर्णय संबंधित खासगी संस्थांनी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतू, जर टीईटी अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांवर संस्थेकडून कारवाई करण्यात आली नाही तर अशा शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी ही संबंधित संस्थेवर असेल. अर्थात अशा शिक्षकांचा वेतन 1 जानेवारी 2020 पासून शासनाकडून देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांवर ही कारवाई करण्यात येणार नाही कारण यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या याचिकेवर काय निर्णय होतो त्यानंतरच या आदेशाचे पालन करायचे की नाही हे ठरवण्यात येणार आहे.