ढगाळ हवामानामुळे पिकावर तांबेरा, पानगळचा प्रादुर्भाव ः पुरंदर तालुक्यातील उत्पादक हताश
सासवड – पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादकांचे बजेट कोलमडले असून, अगोदरच अतिवृष्टी, महापूर यामुळे कंबरडे मोडलेल्या अंजीर उत्पादकांना या पिकाचा एकमेव आधार होता. मात्र, तालुक्यातील हे हक्काचं नगदी पीक देखील ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांपासून हिरावून घेतलेला आहे.
पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादक बदलत्या हवामान व ढगाळ वातावरणामुळे हैराण झाला आहे. या बदलत्या हवामानाचा तालुक्यातील अंजीर बांगाना मोठा फटका बसला आहे, त्यामुळे अंजीर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
हवामानामुळे अंजीर पिकावर मोठ्या प्रमाणावर रोग पडले असून, यामुळे वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.
ढगाळ हवामान व कमी सूर्यप्रकाश यामुळे अंजीर पिकांच्या झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया घटून अंजीर फळाच्या आकारात घट झाल्याने बाजारभाव देखील कमी मिळत आहे. कमी आकाराच्या फळांना बाजारात अत्यल्प मागणी असते. मोठ्या आकाराचे फळ तयार होत नसल्याने कमी आकाराची फळे लवकर पिकत आहेत, त्यामुळे अंजीर उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे आणि हवामान बदलामुळे अंजीर पिकाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ झाली आहे. तांबेरा रोगाने उत्पादकांना हैराण केले आहे. मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्यामुळे अंजीर पिकाला अन्नद्रव्य कमी पडत आहे, त्यामुळे फळांचा आकार कमी झाला आहे.परीणामी अंजीराच्या फळांच्या दर्जामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.
याबरोबरच फळे फुटण्याच्या प्रमाणात वाढले असून, या खराब फळांना अतिशय कमी बाजार मिळत आहे. एकंदरीतच पुरंदर तालुक्यात अंजीर पिकाचे नुकसान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जात असला तरी हे उपाय तोडके पडत आहेत. तालुक्यात एकीकडे चांगला पाऊस झाल्यामुळे सुखावलेला बळीराजा दुसऱ्या बाजूने मात्र अक्षरशः मेटाकुटीस आलेला आहे.
पंचनामे झाले नुकसानभरपाई कधी ?
दोन महिन्यापूर्वी पुरंदर तालुक्यात आलेल्या महापूर व अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील दिवे, सोनोरी, झेंडेवाडी या भागातील अंजीर बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. याबाबत सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे केले. मात्र, या गोष्टीला तब्बल दोन महिने उलटून गेले असूनही नुकसान भरपाईबाबत कोणतेही निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेले नाहीत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार तरी कधी, असा प्रश्न अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही पडला आहे.
ढगाळ हवामानामुळे अंजीर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकाचे दर हेक्टरी उत्पादन घेतलेले आहे. बदलत्या हवामानामुळे फळांचा आकार कमी झाला असून, कमी आकाराच्या फळांना बाजारभाव देखील कमी मिळत आहे. यामुळे उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सरकारने या बाबीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्यांना सरकारी पातळीवर मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
– नितीन काळे, अंजीर उत्पादक शेतकरी, सोनोरी