14 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
मुंबई (प्रतिनिधी) – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहिर करण्यात आली. या यादीत 28 जिल्ह्यातील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचा समावेश असून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट 14 हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. मात्र, राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येत आहेत. राज्यातील सुमारे 36 लाख 45 हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर 34 लाख 98 हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, यासाठी टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील उद्देश आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 15 हजार 358 शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घोषित करण्यात आली होती. तर शनिवारी दुसऱ्या यादीत 21 लाख 82 हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत. शासनाने या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दीड हजार ग्रमपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी दुसऱ्या यादीत सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. या शेतकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे 29 मार्चनंतर कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून या प्रमाणीकरणा नंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बॅंका 24 तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका 72 तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.