राजगुरुनगर (प्रतिनिधी) -शेतजमीन अर्धलीने (अर्ध्या वाट्याने) करायला का घेतली म्हणून दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना मिरजेवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 30) घडली आहे.
या घटनेत मच्छिंद्र किसन मांजरे (वय 35), किसन लक्ष्मण मांजरे (वय 60, दोघेही रा. मिरजेवाडी, ता. खेड) हे हल्ल्यात जखमी झाले आहेत. गोविंद भिकाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मिरजेवाडी, चास येथे आज (दि. 30) सकाळी साडेदहा सुमारास गोविंद भिकाजी जाधव यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरुन जात असताना गोविंद जाधव व मच्छिंद्र मांजरे यांना हरिभाऊ जाधव याची शेत जमिन अर्धलीने करायला का घेतली, असे म्हणून त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले.
गोविंद जाधव याने त्याच्या हातातील कोयत्याने मच्छिंद्र यांच्या मानेवर जोराचा वार केला. दरम्यान किसन मांजरे हे भांडणे सोडविण्यास गेले असता त्यांनाही हातातील कोयत्याने डोक्यात, छातीवर वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेले दोघे चाकण येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत भूषण किसन मांजरे (वय 30) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.