शिरूर – करोना व्हायरस संसर्ग होऊ नये म्हणून शिरूर नगरपालिकेने व शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण मास्क न लावता फिरणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंड किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या कारवाईची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. आज सात जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
शिरूर नगरपालिका हद्दीतील किराणामाल दुकान इतर दुकाने, भाजी पाला, फळ मार्केट व दूध डेअरी या सर्व सकाळी सात ते बारा या वेळचे उघड्या राहणार असल्याचेही रोकडे यांनी सांगितले. शिरूर शहरात नगरपालिकेच्या वतीने सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील विविध भागात शंभर टक्के लॉकडाऊनसाठी प्रयत्नल केले आहेत. नगरपरिषद व सकल जैन समाज यांच्या सहकार्याने माणिकचंद उद्योग समूहाच्या वतीने रोज साडेतीन हजार जेवणाचे डबे देण्यात येत आहेत.
शहरात वेळोवेळी जंतुनाशक एकाची फवारणी सुरू आहे. अशा अनेक सुविधा शिरूर शहरात नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असून, कधी काही अतिउत्साही नागरिक शहरात विनाकारण फिरत असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे.
यासाठी शिरूर नगर परिषदेच्यावतीने कडक निर्बंध करण्याचे ठरवले असून अशा बेपर्वा नागरिकांवर व विक्रेते यांनी मास्क न लावता फिरणे, विनाकारण फिरणारे नागरिक, रस्त्यावर भुंकणारे नागरिक यांच्यावर पाचशे रुपये दंड अशी कारवाई करण्यात सुरुवात झाली असून, शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे व मुकादम मनोज अहिरे बाळासाहेब साळवे यांच्यामार्फत दंडाची कारवाई सुरू असून, जर दंड भरला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.