प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेने केंद्र शासनाच्या “स्वच्छता लीग’मध्ये सहभाग घेतला आहे. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत शहरता स्वच्छता मोहीम होत आहे. तर, दुसऱ्या बाजूला गेल्या तीन दिवसांपासून मध्यवस्ती आणि उपनगरांत कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्यामुळे कचऱ्याची समस्या भीषण बनली असताना पालिका मात्र फोटोसेशनमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे.
महापालिका “पुणेरी नायक’
केंद्राच्या या स्वच्छता मोहिमेत महापालिका “पुणेरी नायक’ या नावाने सहभागी झाली आहे. त्यात शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा सहभाग आहे. या मोहिमेची सुरूवात शनिवारी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम तसेच मेगा ड्राइव्हने करण्यात आली. शहरात एकाच वेळी कात्रज तलाव, ओंकारेश्वर मंदिर, तळजाई टेकडी, रामटेकडीसह 15 क्षेत्रीय कार्यालय हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. शहरातील साडेचार हजार नागरिक यात सहभागी झाल्याचे महापालिकेने सांगितले.
विसर्गानंतर कचऱ्यात वाढ
नदीपात्रात मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला असून, हा कचरा नदीपात्रातच पडून आहे. याशिवाय अनेक भागांत कचराकुंड्या भरून वाहत आहेत. शहरात गणेशोत्सवाची मिरवणूक शनिवारी संपली; त्यानंतर रविवारी पालिकेला सुट्टी असल्याने अनेक भागात कचरा उचलला गेला नाही. परिणामी, सततच्या पावसाने कचरा कुजू लागला असून त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तातडीनं हा कचरा उचलण्याची मागणी होत आहे.