प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -“शिक्षकांना केवळ निवडणूक आणि जनगणनेशी संबंधित कामे देण्यात येणार आहे. यापुढे शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित शिक्षक संवाद आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर, डॉ. निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले, “शिक्षकांना निवडणूक व जनगणनेची कामे देण्यापूर्वीही महसूल विभागात कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेण्यात येईल. त्यानंतरच ही कामे देण्यात येतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना देण्यात येईल.’
डॉ. एकबोटे म्हणाले, “बदलत्या काळानुसार राज्याच्या शालेय शिक्षणात आमूलाग्र बदलासाठी राज्य पातळीवर सल्लागार समिती किंवा मंडळाची स्थापना करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता उत्तम ठेवणाऱ्या शाळांना स्वायत्त दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा.’
शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार
राज्यात बहुतांश प्राथमिक शाळांच्या वेळा सकाळी
7 वाजेपासून आहेत. त्यांचा मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येतो. मुलांची व्यवस्थित झोप होऊन, त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू असल्याचे केसरकर यांनी सांगितले.