– हेमंत देसाई
भ्रष्टाचार व दहशतवादाविरुद्ध जंग लढणाऱ्या मीरसारख्या पत्रकारांचा छळ सुरू आहे. पाकिस्तान म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची स्मशानभूमीच आहे.
बरोबर सात वर्षांपूर्वी पाकिस्तानातील नामवंत दूरचित्रवाणी पत्रकार हमीद मीर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. आरोपींना अटक करण्यासाठी महत्त्वाची माहिती देणाऱ्यांना एक कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली होती. आयएसआयने हा हल्ला घडवला, असा आरोप मीर यांच्या भावाने केला होता. परंतु पाकिस्तानी लष्कराने तो अर्थातच फेटाळून लावला.
विशेष म्हणजे, त्यानंतर काही वर्षांनी मीर पुन्हा चर्चेत आले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या जैश-ए-मुहम्मद या पाक संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भाराताच्या प्रयत्नात चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला.
त्यामुळे त्या संदर्भात भारताने केलेली मोर्चे बांधणी अयशस्वी ठरली. या बाबतीत हमीद मीरने मसूदची तुलना नोबेल पुरस्कार विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामांशी केली. भारताने चीनचा शत्रू असलेल्या दलाई लामांना आश्रय दिला आहे व म्हणूनच मसूदविरोधी प्रस्तावात चीनने आडकाठी घातली, असे ट्विट हमीदने केले.
या सर्व पार्श्वभूमीवर, कायम वादग्रस्त असणाऱ्या मीरला, “तुम्ही पाकिस्तान कधी सोडणार?’ असा सवाल विचारण्यात येतो. पाकिस्तानात माझ्या जीवाला धोका आहे, अशी भीती आपल्या मित्रांना वाटत असली, तरी आपण पाकिस्तान सोडणार नाही, असे मीर यांनी स्पष्ट केले आहे. हमीद मीर यांनी 1987 साली लाहोरमधील “डेली जंग’पासून पत्रकारितेस सुरुवात केली.
1990 साली पाकिस्तानचे अध्यक्ष गुलाम इसहाक खान बेनझीर भुत्तो सरकार बरखास्त करणार असल्याची बातमी मीर यांनी दिली, तेव्हा त्यांना या बातमीचा स्रोत कोणता, ते विचारण्यासाठी पळवून नेण्यात आले आणि बदडून काढण्यात आले.
1994 साली पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती आसिफ झरदारी यांच्या निकटवर्तीयांनी पाणबुडी खरेदीत पैसे खाल्ले होते. ही बातमी मीर यांनी छापल्याबरोबर “जंग’ने त्यांची हकालपट्टी केली. 1996 साली मीर इस्लामाबाद येथील “डेली पाकिस्तान’ या राष्ट्रीय उर्दू दैनिकाचे संपादक झाले. तेथे असताना 1997 साली त्यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला.
त्याबरोबर त्यांना तेथूनही गचांडी मिळाली. त्यानंतर मीर यांनी “डेली औसाफ’ हे स्वतःचे दैनिक सुरू केले. ओसामा बिन लादेन याची मुलाखत घेणारे ते पहिले पत्रकार. त्यांनी त्यांची तीन वेळा मुलाखत घेतली. अगदी 9-11च्या हल्ल्यानंतरदेखील. 2001 मध्ये अफगाणिस्तानच्या तोराबोरा या डोंगर प्रदेशातून लादेन कसा निसटला, याची कहाणीही मीर यांनी दिली होती.
ओसामाचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे. 2002 साली मीर यांनी “जिओ न्यूज’ मध्ये प्रवेश केला आणि चालू घडामोडींवर आधारित “कॅपिटल टॉक’ हा कार्यक्रम सुरू केला. मीर यांनी ‘जिओ’साठी जॉन केरी, हिलरी क्लिंटन, टोनी ब्लेअर, कॉलिन पॉवेल, कोंडोलिझा राइस, नेल्सन मंडेला, शिमॉन पेरेस प्रभृती जागतिक नेत्यांच्या मुलाखतीही घेतल्या.
परंतु गेल्या आठवड्यात हमीद मीरना “जिओ’नेच बहिष्कृत केले. याचे कारण वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने त्यांनी एक भाषण दिले. 2007 मध्येदेखील पाकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी मीर यांच्यावर अशीच कडक करवाई केली होती.
काही दिवसांपूर्वी असद अली तूर या पत्रकाराच्या इस्लामाबादेतील घरी जाऊन अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण केली होती. “आयएसआय’चा यात हात असल्याचा संशय व्यक्त झाला होता. तूरला पाठिंबा देण्यासाठी इस्लामाबादच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये शेकडो वकील, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जमा झाले होते.
त्यावेळी दिलेल्या भाषणात मीर म्हणाले, “तुम्ही जर आमच्या घरात घुसून आम्हाला मारणार असाल, तर आम्ही घराबाहेर येऊन त्याचा शांततापूर्वक प्रतिकार करू. कारण आमच्याकडे तुमच्यासारख्या बंदुका व रणगाडे नाहीत.’ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पत्रकारांना फारसे स्वातंत्र्य कधी मिळालेच नाही. पण आजचे संकट पूर्वीपेक्षाही अधिक भीषण आहे, असे सर्वसाधारण मत आहे.
पाकिस्तानच्या व्यवस्थेविरुद्ध जो कोणी बोलतो, तो देशद्रोही समजण्यात येतो. भारतात आज अनेक राज्यांत पत्रकारांवर हल्ले होत असतात. अलीकडेच विनोद दुआ यांना देशद्रोहाच्या आरोपावरून खटल्यास सामोरे जावे लागले. सरकारविरोधी बोलणाऱ्या पत्रकाराला देशद्रोही ठरवता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने या प्रकरणी दिला आहे.
परंतु भारत व पाकिस्तानची समान पायावर तुलना करता येणार नाही. पाकिस्तानात पत्रकारांना सर्रास गोळ्या घातल्या जातात वा त्यांना “अदृश्य’ केले जाते. हमीद मीर यांच्यावर सात वर्षांपूर्वी सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातल्या दोन गोळ्या अद्यापही त्यांच्या शरीरात आहेत.
मीर यांनी त्यावेळी ड्रामेबाजी केली, असा आरोप तेव्हा आयएसआयच्या पित्यांनी केला होता. परंतु तेव्हा “मीर हे माझे आवडते अँकर आहेत’, असे उद्गार इम्रान खान यांनी काढले होते. आज तेच पंतप्रधान बनले असले, तरी त्यांची राजवट लष्कर व “आयएसआय’च्या पंजाखालीच आहे.
या हल्ल्यापूर्वी दोनच वर्षे अगोदर मीर यांच्या कारमध्ये तहरीक-ए-तालिबानने बॉंब ठेवला होता. या संघटनेचे प्रवक्ते एहसान उल्ला एहसान याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या एहसानला 2017 साली अटक झाली होती व तेव्हा त्याची मुलाखत घेण्यास पत्रकारांना परवानगी देण्यात आली होती.
परंतु एकाही पत्रकाराने त्याला “तू हमीदच्या गाडीत बॉंब का ठेवलास, असा प्रश्न विचारला नाही. 2020 साली एहसान पोलिसांच्या कोठडीतून पळून गेला. खरे तर त्याला पळून जाण्यास आयएसआयनेच मदत केली, असे बोलले जाते. गेल्या तीन दशकांत पाकमधील 140 पत्रकारांचा बळी घेण्यात आला आहे.