गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये करोना महामारीने समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वच घटकांना फटका दिला असताना त्यापासून क्रीडाक्षेत्रही वेगळे राहिलेले नाही. गेले काही महिने क्रीडा क्षेत्राशी संबंधित सर्व खेळांचे प्रकार आणि त्यांच्या स्पर्धा स्थगित राहिल्या होत्या.
आता येत्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा होणार असल्या, तरी त्या स्पर्धांवरही महामारीचे सावट कायम राहणार आहे, हे नाकारून चालणार नाही. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये नियमाप्रमाणे होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करावी लागली होती.
आता ती या वर्षी घेण्यात येणार आहे; पण तरीसुद्धा ही स्पर्धा पूर्वीच्या क्षमतेने आणि त्याच उत्साहाने खेळली जाईल की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. क्रिकेट क्रीडा प्रकारातील टी 20 विश्वचषक स्पर्धा या वर्षी खेळण्याचे नियोजन होते;
पण या स्पर्धा पार पडतील की नाही याबाबत आता कोणतीही खात्री देता येत नाही. किमान ज्या देशांना या क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळाले होते त्या देशातील महामारीची स्थिती लक्षात घेऊनच त्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा भरवणे शक्य आहे की नाही, याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
त्यानंतर ही स्पर्धा अन्य देशात हलवली जाऊ शकते. संपूर्ण जगातील क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची मानली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या वर्षी जपानमध्ये टोकियो येथे होणार आहे. त्यासाठी जपानच्या प्रशासनाने सर्व तयारी केली असली तरीही या स्पर्धेवरही महामारीचे प्रचंड सावट आहे.
एरव्ही ज्या उत्साहात आणि ज्या भव्यतेने ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाते त्या प्रकारचा कोणताही उत्साह आणि भव्यपणा यावेळी दिसणार नाही, हे उघड आहे. कारण अनेक देशांनी आपली पथके पाठवताना खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे. मुख्य म्हणजे जपानमधून विशेषतः
टोकियोमधूनही अद्याप महामारी संपूर्णपणे हद्दपार झाली नसल्याने अनेक देशांनी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घ्यावा की नाही, याबाबतही विचार सुरू केला आहे. खरे तर दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आताची परिस्थिती फारशी वेगळी नसल्याने टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा अट्टाहास ऑलिम्पिक कमिटीने का धरला आहे, हे कळत नाही.
कारण जरी ही स्पर्धा संपूर्णपणे सुरक्षित वातावरणात आणि नियंत्रित परिस्थितीमध्ये झाली तरी आतापर्यंत झालेल्या कोणत्याही स्पर्धेएवढी भव्यता, स्पर्धात्मकता आणि चुरस यावेळी नसणार, हे उघड आहे. अनेक देशांतील महत्त्वाच्या खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे, हेसुद्धा विसरून चालणार नाही.
अर्थात ऑलिम्पिक स्पर्धा भरविणे ही मानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट असल्याने ही स्पर्धा संपूर्णपणे यशस्वीपणे पार पाडण्याचा मान जपानला हवा असल्याने कदाचित ही स्पर्धा पार पडेलही; पण ज्या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महामारीच्या पुढच्या टप्प्याला हातभार लागणार नाही याची दक्षताही प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. हीच गोष्ट क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट या खेळाचीही आहे.
खरे तर जागतिक वेळापत्रकाप्रमाणे जूननंतर इंग्लंडसारख्या देशामध्ये क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी सामना सुरू आहे आणि 18 तारखेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
दुसरीकडे भारतातील आयपीएलची स्पर्धाही अर्धवट सोडण्यात आली होती, ते उर्वरित सामने आता कदाचित संयुक्त अरब अमिरातीत ठेवले जातील. या वर्षाच्या उत्तरार्धात भारतात प्रतिष्ठेची अशी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार होती; पण ही स्पर्धासुद्धा अमिरातीत हलवण्याबाबत आयसीसीने प्रस्ताव ठेवल्याची बातमी असल्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धेपासूनही भारताला वंचित राहावे लागणार आहे.
बायो बबल पद्धतीच्या वातावरणात राहूनही आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना करोनाची बाधा झाली असल्याने ही पद्धत कितपत उपयुक्त ठरते यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय खेळाडूंच्या मानसिकतेवरही नकारात्मक परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे.
त्यामुळेच या वेळी इंग्लंडवरील दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासोबत त्यांच्या कुटुंबांनाही पाठवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑलिम्पिकसारखी सर्वसमावेशक क्रीडा स्पर्धा असो की, क्रिकेटसारखी काही देशांपुरती मर्यादित असणारी क्रीडा स्पर्धा असो त्या भोवतीही एक अर्थव्यवस्था गुंतलेली असते.
क्रिकेट पुरताच विचार केला तर आयोजकांच्या जाहिराती प्रसारणाचे हक्क यामधून अब्जावधी रुपयांचे व्यवहार होत असतात. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये चॅनल किंवा या क्रीडा क्षेत्राशी संबंधित जे आर्थिक घटक असतात त्यांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहेच. जरी प्रत्यक्ष सामना सुरू असताना प्रेक्षकांना बसण्यासाठी परवानगी नसली तरी त्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत असल्याने काही प्रमाणात वाहिन्या आणि जाहिरातदार यांची भरपाई होत असली,
तरी मैदानावर प्रेक्षकांसमोर खेळण्याचा आनंद खेळाडूंना मिळत नाही, हेसुद्धा वास्तव नाकारून चालणार नाही. अर्थात समाजातील सर्वच घटक जर करोना महामारीत मूलभूत नियमांचे पालन करत असतील, तर त्याचे पालन क्रीडा क्षेत्रालाही करावे लागणार आहे. मैदानावर प्रेक्षकांना परवानगी न देता सुरक्षित वातावरणामध्ये स्पर्धा घेणे शक्य आहे,
हे गेल्या काही महिन्यांमध्ये सिद्धही झाले आहे. त्यामुळे जरी करोना महामार्गाची तीव्रता जास्त असली तरी टोकियो ऑलिम्पिकसारखी सर्वसमावेशक स्पर्धा असो किंवा भारतात नियोजित असलेली टी-20 चषक क्रिकेट स्पर्धा असो या स्पर्धा ठरल्याप्रमाणे होतील,
असे आता तरी दिसत आहे. पण या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महामारीची तीव्रता वाढण्यास हातभार लागणार नाही याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळात इतर कोणतेही विशेष मनोरंजन उपलब्ध नसणाऱ्या लोकांसाठी टीव्हीवर हे क्रीडा
स्पर्धेतील सामने पाहणे एक मनोरंजनाचे प्रमुख साधन उपलब्ध असल्याने या स्पर्धा सर्वांनाच हव्या आहेत. पण या स्पर्धा भरवताना सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल आणि नियंत्रित परिस्थिती असेल याची खात्री मात्र संयोजकांना आणि संबंधित देशांना घ्यावीच लागणार आहे.