नवी दिल्ली – देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक असणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी ही घोषणा केली. 1 जानेवारी 2021पासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील, असे ते म्हणाले.
फास्टॅग ही संकल्पना 2016पासून सुरू करण्यात आली. चार अधिकृत बॅंकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना फास्टॅग वितरित केले जातात. 2017 मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला. आणि 2018च्या अंती हा आकडा 34 लाखांवर जाऊन पोहोचला आहे.
नोव्हेंबर 2020मध्ये रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून 1 जानेवारी 2021पासून फास्टॅग बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले. 1 डिसेंबर 2017 च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टॅग बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची व्हॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.