मेलबर्न – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नादी लागू नकोस, त्यांच्यापासू दूर राहा, असा सल्ला रवींद्र जडेजा याला चाहत्यांनी सोशल मीडियावर दिला आहे.
जडेजाने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये जडेजा हा कॉफी पीत असल्याचे दिसत होते. या पोस्टखाली जडेजाने एक कमेंट केली होती. या कमेंटमध्ये जडेजाने लिहिले होते की, कॉफी, कारण बाकी काही पिण्यासाठी ही योग्य वेळ नाही. या कमेंटनंतर चाहत्यांनी जडेजाला शास्त्री यांच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.
त्याचबरोबर शास्त्री यांनी ज्या खेळाडूची स्तुती केली होती तो खेळाडू अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. शास्त्री यांनी पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा व वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली होती. पण पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी सपशेल अपयशी ठरला होता. पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी फक्त सहा चेंडू खेळला होता आणि त्याला चारच धावा करता आल्या होत्या. त्यामुळे आता जडेजालाही शास्त्री यांच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा भरात होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याच्या डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायाचे स्नायूही दुखावले गेले होते. त्यामुळेच जडेजाला पहिल्या कसोटी सामन्यात स्थान देण्यात आले नव्हते. जर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. मात्र, त्यासाठी त्याला तंदुरुस्त चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.
तो जर गोलंदाजी करु शकेल इतका तंदुरुस्त ठरला तरच त्याचा बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघात समावेश केला जाणार आहे. जडेजा गोलंदाजीचे मोठे स्पेल टाकण्यासाठी फिट असेल तर नक्कीच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात येईल. जडेजाला जर संघात खेळवायचे असेल तर कदाचित हनुमा विहारीला संघाबाहेर जावे लागेल.