पाटणा – महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली परिस्थिती पाहता तिथे राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्र वादानंतर शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला झालेली मारहाण, तसेच कंगना प्रकरणावरुन चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
चिराग पासवान म्हणाले, ज्याप्रकारे उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात टार्गेट केले जात आहे. तसेच कंगनाने प्रश्न विचारले म्हणून ज्याप्रकारे तिचे कार्यालय तोडण्यात आले आणि फक्त व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून ज्याप्रकारे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. यावरून लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचं वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी बिहारमधील राजकारण जोरदार तापले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना प्रकरणावरुन राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर आता लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.