बाजरी पीकही हातचे गेल्याने सोमेश्वरनगरचे शेतकरी चिंताग्रस्त
सोमेश्वरनगर (वार्ताहर) – यावर्षी परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने तालुक्यातील गहू पिकाची पेरणी एक महिन्याने उशिरा झाली असून, आता ती चांगली उगवण्याच्या मार्गावर आहे; परंतु हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पाऊस येण्याची शक्यता वर्तवली असल्याने आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे गहू पिकावर रोगराई पसरत आहे.
परतीच्या पावसाने बाजरी पीक गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मात्र, आता गहू हे पीक देखील जाईल का, हीच भीती आता सोमेश्वरनगर परिसरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे. चालू महिन्यात पोषक हवामान म्हणून बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्याने गहू पीक घेतले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि चालू वर्षी थंडी कमी प्रमाणात असल्याने गहू पिकावर रोगराई होऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी औषधे फावरण्यास सुरुवात केली आहे.
या भागात शेतकऱ्यांनी लोकवन गोल्ड 2189 आदी जातीच्या बियाणांच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र, गव्हाला पोषक वातावरण नसल्याने त्याची वाढ कमी प्रमाणात झाल्याने चित्र दिसत आहे. कुठलीही रोगराई व त्याचे प्रमाण पुढील काही दिवसांत कमी झाले तरच गव्हाचे पीक जोमात येईल आणि गव्हाला चांगला बाजार मिळेल अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा शेतात गव्हाचे पीक घेतले असून, एकरी पंधरा ते वीस हजार खर्च आला आहे. यंदा कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव सध्या तरी नाही; पण थंडीचे प्रमाण वाढले तर गव्हाचे उत्पन्न जास्त निघेल. सध्या गव्हाला 28 ते 30 रुपये बाजारभाव आहे. खर्चाच्या तिप्पट रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
– संतोष बडदे, प्रगतशील शेतकरी, सोमेश्वरनगर सोरटेवाडी, ता. बारामती