थंडीचा अभाव; उत्पादन घटण्याची चिन्हे; शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भुर्दंड
कर्जत – ऐन हिवाळ्यातही असलेला थंडीचा अभाव आणि वातावरण बदलाचा फटका गव्हाच्या पिकाला बसत आहे.कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे.
मात्र सध्या गहू पिवळा पडू लागला असून त्याची वाढ खुंटली आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. उगवण्याच्या काळातच गहू पिकाला अवकाळी पावसाने झोडपले. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वातावरणातील बदलाचा फटका बसला आहे. तालुक्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी आदी पिकांची काढणी करून शेतीची मशागत केली होती. परंतु त्याचवेळी परतीच्या पावसाने अनेक दिवस धुमाकूळ घातल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली होती.नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीची पुन्हा मशागत करण्यात आली.
कमी खर्चात जादा उत्पादन घेण्याच्या उद्देशाने काही शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने गव्हाची लागवड केली. तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गव्हाची पारंपरिक पद्धतीने पेरणी केली. मात्र सध्या वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे.सकाळी थंडी, दुपारी उष्णता तर अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या लहरी हवामानामुळे वाढीच्या काळातच गव्हाचे पीक पिवळे पडू लागले आहे. किमान हे पीक पूर्णपणे हातात यावे यासाठी शेतकरी औषध फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.