देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस एखाद्या आपत्तीप्रमाणे बरसत आहे. मैदानी भागापासून ते डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे डोंगरावरून दरड कोसळण्याच्या बातम्या येत असतानाच दुसरीकडे मैदानी भागात पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीत संततधार पाऊस आणि हरियाणातील हथनी कुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दिल्लीतील यमुना नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. आज (सोमवार) सायंकाळी पाच वाजता यमुनेने धोक्याचा टप्पा ओलांडला. हिमाचल प्रदेशातही नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.
नवी दिल्लीत यमुनाने ओलांडली धोक्याची पातळी –
नवी दिल्लीतही यमुना नदी धोक्याच्या चिन्हावर पोहोचली आहे. उद्या म्हणजेच 11 जुलै रोजी यमुना धोक्याचे चिन्ह ओलांडेल असे मानले जात होते, परंतु आज (सोमवार) यमुनाने दिल्लीत संध्याकाळी 5 वाजता धोक्याच्या चिन्हावर पोहोचली आहे. धोका लक्षात घेऊन यमुना नदीजवळ राहणाऱ्या लोकांना तेथून हटवण्यात येत आहे. संध्याकाळी 5 वाजता यमुनेची पाणी पातळी 205.40 मीटर नोंदवली गेली.
CWC च्या फ्लड-मॉनिटरिंग पोर्टलनुसार, जेंव्हा यमुना 205.33 मीटरच्या वर वाहते तेव्हा ती धोक्याच्या चिन्हाच्या वर मानली जाते. हथिनीकुंड बॅरेजमधून सतत पाणी सोडल्याने यमुना धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास हथिनी कुंड बॅरेजमधून 2 लाख 18 हजार 351 क्युसेक पाणी यमुनेमध्ये सोडण्यात आले.
यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दिल्लीतील सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारही अलर्ट मोडमध्ये आले आहे. यापूर्वी 1978 आणि 2010 मध्ये राजधानीत पूर आला होता. त्यावेळी अनेक भागात पूर आला होता. 1978 मध्ये यमुनेमध्ये दोन लाख 24 हजार 390 क्युसेक पाणी सोडण्यात आले होते.
धोक्याच्या चिन्हावरून नद्या वाहत आहेत –
हिमाचल प्रदेशात बियास आणि पारबती नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. कुल्लू पोलिसांनी सर्व नागरिकांना नदीच्या काठावर न जाण्याचे आवाहन केले आहे. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच शिमल्यापासून 50 किमी अंतरावर असलेल्या सुन्नीमध्ये सतलज नदीही धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे.
शिमला जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी, शिमला-हटकोटी राष्ट्रीय महामार्गावरील कोकुनाला पुलाचा काही भाग कोसळला, त्यामुळे वाहनांची वाहतूक ठप्प झाली आणि पुलाला तडे गेले. त्यामुळे आता पूल तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा पूल सध्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणतात की, उत्तर भारतातील राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांवरील ढिगारा हटवण्यासाठी राज्यभरात सुमारे 342 मशिन्स तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर कुल्लू-मनालीमध्ये अडकलेल्या अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
चमोली आणि चंदीगडमध्ये शाळा बंद –
हिमाचल प्रदेशातील मुसळधार पावसामुळे चमोली येथील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा बुधवार, 12 जुलै रोजी बंद राहणार आहेत. हवामान खात्याचा अंदाज पाहता चमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच चंदीगडमधील सर्व शाळा 13 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.