नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुका आणि विधानसभा पोटनिवडणुका एकाच वेळी होणार आहेत, या निवडणुकीत राज्यातील जनता कॉंग्रेसच्याच पाठीशी उभी राहील असा विश्वास काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी व्यक्त केला आहे. सत्याचा विजय होईल असेही त्यांनी नमूद केले आहे.
त्या म्हणाल्या, एकीकडे पैसा आणि एजन्सी वापरून सत्तेसाठी भाजप विरोधकांवर कुरघोड्या करीत आहे. या प्रक्रियेत लोकशाही नष्ट होत आहे, तर दुसरीकडे सत्य, धैर्य आणि संयमाने जनतेसाठी अथक काम करण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे.हिंदीमध्ये एका पोस्टमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या, मी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना भेटले. त्यांनी एकजुटीचा, कठोर परिश्रमाचा निर्धार केला आहे. या नेत्यांमधील धैर्य आणि लोकांप्रती त्यांचे समर्पण यांचा मला अभिमान आहे. एकीकडे भाजपचे भय, लोभ आणि खोटेपणाचे साम्राज्य आहे.
पैशाच्या बळावर आणि एजन्सींच्या सहाय्याने सत्तेचा पाठलाग हे लोकशाहीला नष्ट करणारे राजकारण आहे. तर दुसरीकडे जनतेसाठी अथक काम करण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे असे त्यांनी म्हटले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आणि सत्याचा विजय होईल,असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
हिमाचल प्रदेशमध्ये, १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसह सहा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहे. काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेनंतर हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे.
हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चार जागा आहेत – हमीरपूर, मंडी, शिमला आणि कांगडा.२०१९ मध्ये भाजपने चारही जागा जिंकल्या. नंतर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी विद्यमान खासदार राम स्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मंडीची जागा हिसकावून घेतली.
२०२२ मधील हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा होत्या. यापूर्वी त्यांनी काँग्रेससाठी “ट्रबल-शूटर” ची भूमिकाही बजावली आहे.